“एवढ्या मोठ्या नेत्याच्या घरावर लोक प्लॅनिंग करून जातात, तेव्हा पोलीस काय करत होते. एवढ्या मोठ्या आंदोलनाची पोलिसांना कल्पना नसणे, हे पोलिसांचं अपयश आहे. पोलिसांच्या आणि गुप्तचर यंत्रणांच्या या अपयशाची चौकशी व्हायला हवी, माध्यमांचे कॅमेरामॅन त्याठिकाणी पोहोचले पण पोलीस उशीरा पोहोचले, याचं कारण काय?” असा सवाल सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनानंतर राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

“अरे वेड्या…”, सिल्व्हर ओकवरील आंदोलनावरून अमोल मिटकरींचा भाजपाला खोचक सवाल

“शरद पवारांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाचं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं, ते दृश्य अतिशय भयावह होतं. त्यामुळे याची चौकशी झालीच पाहिजे,” असं देवेंद्र फडणवीस कोल्हापुरात बोलताना म्हणाले. तसेच काल घडलेल्या घटनेचे मास्टरमाईंड नागपुरात बसलेले आहेत, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी केला होता. त्यावर बोलताना “आपण अशा लोकांच्या आरोपांना उत्तर देत नाहीत,” असं फडणवीसांनी म्हटलंय.

नेमकं काय घडलं?

 गेले पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पेडर रोड येथील सिल्व्हर ओक या निवास्थानी आंदोलन केले. आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पल आणि दगडफेकही केली. 

“माझी हत्या झाल्यास गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार”; गुणरत्न सदावर्तेंचे शरद पवारांवर गंभीर आरोप

याप्रकरणी १०७ आंदोलकांवर गावदेवी पोलीस ठाण्यात दंगल माजवण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी २३ महिला आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे समजते. या घटनेमागे कोण आहे, त्याचा तपास केला जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. शरद पवार यांच्या निवासस्थानाच्या परिसरात आंदोलक कसे घुसले, गुप्तचर विभागाला त्याची काही माहिती मिळाली नाही का, याचाही तपास केला जाईल. तशा सूचना पोलीस आयुक्तांना दिल्याची माहिती वळसे यांनी दिली.