विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावरून टीकास्त्र सोडलं आहे. आमच्या सरकारने आदिवासी समाजातील कुपोषण हटवण्यासाठी पुरकपोषण आहाराची योजना सुरू केली. मात्र, या नालायकांनी असा माल दिला की कुत्रं देखील खाणार नाही, असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीसांना मविआ सरकारवर केला. ते गडचिरोलीत मविआ सरकारच्या विरोधात भाजपाने आयोजित केलेल्या महाजनआक्रोश मोर्चात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आदिवासी समाजासाठी तेथील कुपोषण संपवण्यासाठी पुरकपोषण आहाराची योजना आपल्या सरकारने सुरू केली. त्यात अन्नधान्य, मीठ, हळद, मसाले सगळ्या गोष्टी आहेत. पण या सरकारने त्याचं काम अशा ठेकेदारांना दिलं, की मी तो माल उचलून आणला आणि अधिवेशनात दाखवला. ही योजना आमच्या सरकारने सुरू केली होती.”

“या नालायकांनी असा माल दिला होता की कुत्रं देखील…”

“आम्हाला वाटलं हे सरकार पुढे नेईल, पण मी गोडाऊनमधील माल पाहिला. या नालायकांनी असा माल दिला होता की कुत्रं देखील खाणार नाही. कुत्र्याला टाकला तर कुत्रंही तोंड बाजूला करेल, असा माल आदिवासींकडे नेण्याचं पाप या सरकारने केलं. हे सरकार आदिवासीच्या तोंडचा घास पळवणारं आहे,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

“मोदींचं नाव होईल म्हणून या सरकारनं गरिबांपर्यंत अन्नधान्य पोहचू दिलं नाही”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “हे सरकार किती नालायक आहे, मोदींनी करोनाच्या काळात गेली दोन वर्षे आमच्या गरिबांकरता मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला. हजारो टन अन्नधान्य या महाराष्ट्रात आलं. अनेक गोडाऊनमध्ये तांदुळ-गहू सडला, पण मोदींचं नाव होईल म्हणून या सरकारनं त्या गरिबांपर्यंत अन्नधान्य देखील पोहचू दिलं नाही.”

“गरिबाच्या तोंडचा घास काढतात सरकार तुम्हाला काय न्याय देणार आहे?”

“जे गरिबाच्या तोंडचा घास काढतात ते सरकार तुम्हाला काय न्याय देणार आहे? त्यामुळे या अन्यायी सरकारच्या विरुद्ध जोपर्यंत आपण हल्लाबोल करत नाही, जोपर्यंत या सरकारच्या विरोधात संघटीत होत नाही, जोपर्यंत हा बुलंद आवाज मुंबईच्या मंत्रालयाला थरथर कापायला लावत नाही तोपर्यंत हे सरकार वठणीवर येणार नाही. म्हणून हा एल्गार आम्ही गडचिरोलीतून सुरू केलाय,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

हेही वाचा : “वेश्यांना द्यायच्या पैशातही डल्ला मारणाऱ्यांना…”, संजय राऊतांचं नाव घेत फडणवीसांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

यावेळी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे, खासदार अशोक नेते, राजे अंबरिशराव आत्राम, आमदार देवराव होळी, कृष्णा गजबे, किर्तीकुमार भांगडिया आणि इतर नेते उपस्थित होते.