सध्या मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरुद्ध भाजपा अशी राजकीय लढाई सुरू आहे. आरे येथील कारशेडचे काम बंद करून मेट्रो कारशेड कांजूरमार्गमध्ये स्थलांतरित करण्यात आली होती. या ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्यास केंद्राच्या याचिकेमुळे उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीच्या वांद्रे-कुर्ला संकुलातील जागेत कारशेड उभारण्याच्या पर्यायावर राज्य सरकारने चाचपणी केली आहे. अशा परिस्थितीत राज्य सरकारनेच गठित केलेल्या पॅनेलने दिलेल्या अहवालावरून भाजपाने ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
सौनिक समितीतील सदस्यांनी मुंबई आणि उपनगरांत सर्व ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यानंतर एक अहवाल सादर केला. त्या अहवालात मेट्रो ३ च्या कारशेडसाठी आरेव्यतिरिक्त दुसरा चपखल बसणारा पर्याय नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. काही ठिकाणे पर्यावरणाच्या दृष्टीने न चालणारी तर काही ठिकाणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारी असल्यामुळे आरेइतकी उत्तम जागा मुंबईत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. या मुद्द्यावर ट्विट करत भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरे सरकारवर टीका केली. तोंड फोडू घेण्याची सवय असणाऱ्यांना लाज वाटत नाही आणि म्हणूनच हे सरकार महानिर्लज्ज आहे, असं ट्विट त्यांनी केलं. “आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल… तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार…”, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली.
आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल…
तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार… @OfficeofUT pic.twitter.com/5kl3Lc8HOA— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 25, 2020
याआधीही याच मुद्द्यावर अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले होते. “आरे येथील कारशेडला सर्व परवानग्या मिळाल्या असताना सुद्धा व तेथील ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झालेले असतानादेखील मेट्रो कारशेड इतरत्र स्थलांतरित करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हा निर्णय घेताना मुंबईच्याबद्दल ‘चांगलाच’ विचार मुख्यमंत्र्यांनी केला असेल. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नवीन ठिकाणी मेट्रो कारशेड उभारण्याच्या नियोजनाचे व ब्लु प्रिंटचे मुंबईतील लोकप्रतिनिधींना सादरीकरण करावे”, अशी आग्रही मागणी अतुल भातखळकर यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
