मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं १ मे रोजी उद्घाटन करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असून यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना आदेश देखील दिले आहेत. त्यामुळे एकीकडे नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता असतानाच दुसरीकडे या रस्त्याच्या श्रेयाचा वाद निर्माण झाला आहे. समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा घाट घालताना शिवसेना त्याचं श्रेय घेत असल्याचा दावा केला जात असताना राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला खोचक शब्दांत टोला लगावला आहे.

“घाईघाईत काम आटोपलं तर…”

देवेंद्र फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचं काम पूर्ण झाल्यानंतरच त्याचं उद्घाटन करण्यात यावं, अशी अपेक्षा व्यक्त केली. “समृद्धी महामार्ग सुरू झाला पाहिजे. त्यासाठी मला आनंद आहे. मला इतकंच वाटतंय की त्याची कामं पूर्ण झालेली नाहीत. ती पूर्ण करूनच उद्घाटन झालं, तर चांगलं होईल. घाईघाईत उद्घाटन आटपून घेतलं, तर रस्ता सुरू होईल पण त्यातून त्या रस्त्याला जे महत्त्व आहे , ते कमी होईल. त्याचं कधीही उद्घाटन झालं तरी मी त्याचं स्वागतच करेन”, असं फडणवीस म्हणाले.

“२० वर्ष ही संकल्पना माझ्या डोक्यात होती”

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली होती. यासंदर्भात आता शिवसेनेकडून श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी ठाकरे सरकारला टोला लगावला. “कुणी कितीही प्रयत्न केला, तरी माझं नाव समृद्धी महामार्गावरून मिटवता येणार नाही. ते काही माझं श्रेय नाही. जनतेनं तेव्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली. ही संकल्पना २० वर्ष माझ्या डोक्यात होती की अशा प्रकारचा रस्ता झाला पाहिजे. तेव्हा आम्ही ते करू शकलो”, असं ते म्हणाले.

“तेव्हा या प्रकल्पाला विरोध करणारेच आता…”

“मला या गोष्टीचा आनंद आहे, की तेव्हा या रस्त्याला जे मोठ्या प्रमाणावर विरोध करत होते, ते लोक देखील या रस्त्याच्या उद्घाटनाचा प्रयत्न करत आहेत”, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.