राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्री करण्याला परवानगी देणारा निर्णय घेतल्याने त्यावरून राज्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे. यामध्ये निर्णयावर संमिश्र प्रतिक्रिया येत असताना विरोधकांनी मात्र तीव्र आक्षेप घेतला आहे. असं असताना सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या निर्णयावर प्रतिक्रिया देताना निर्णय मागे घेण्याचा विचार केल्यास आपला विरोध नसल्याची भूमिका मांडली आहे. या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करणाऱ्या विरोधकांनी आता शरद पवारांच्या या भूमिकेवरून खोचक निशाणा साधला आहे. शरद पवारांनीच एक प्रकारे सल्ला दिलाय की… विधानसभा विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात बोलताना राज्य सरकारवर टीका केली आहे. "मला वाटतं की शरद पवारांच्याही हे लक्षात आलं आहे की हा निर्णय चुकला आहे. त्यांच्या लक्षात आलं आहे की समाजाच्या सर्व स्तरातून या निर्णयाला विरोध होत आहे. या निर्णयातून सरकारची अब्रू चालली आहे. जे काही डीलिंग करून या सरकारने काही मूठभर लोकांच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला, त्यातून हे सरकार एक्स्पोज झालं आहे. त्यामुळे या सरकारला हा निर्णय मागे घ्यावाच लागेल. हे पवारांच्याही लक्षात आल्यामुळे त्यांनी सरकारला एक प्रकारे सल्लाच दिला आहे की सुधरा", असं फडणवीस म्हणाले. "शहाणपण असेल तर…" "सरकारमध्ये शहाणपण असेल, तर हा निर्णय मागे घेतील. नसेल, तर आम्ही जनतेमध्ये जातोच आहे. सर्वच स्तरातून याला विरोध होत आहे", असं देखील फडणवीस म्हणाले. काय म्हणाले शरद पवार? शरद पवारांनी यासंदर्भात भूमिका मांडताना निर्णय मागे घ्यायला अनुकूलता दर्शवली आहे. "वाइन तसंच इतर मद्यांमधील फरक समजून घेण्याची भूमिका घेतली पाहिजे. ती घेतली नाही आणि त्याला विरोध असेल तर सरकारने या सगळ्या गोष्टीसंदर्भात वेगळा विचार केला तरी माझा विरोध असण्याचं कारण नाही. हा चिंताजनक विषय आहे असं वाटत नाही. पण काहीजणांना वाटत असेल तर त्यासंबंधी राज्य सरकारने वेगळा दृष्टीकोन स्विकारला तर त्याच्यात फारसं वावगं होणार नाही", असं देखील शरद पवार म्हणाले.