करोनामुळे मुंबईसह महाराष्ट्रातील परिस्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे, असं सांगत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं असून, त्यात राज्यातील एकूण स्थिती मुख्यमंत्र्यांच्या निर्दशनास आणून दिली आहे. विशेषतः फडणवीस यांनी मुंबईतील वाढत्या मृत्यूदराबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “मुंबई व महाराष्ट्रातील करोनाची स्थिती दिवसेंदिवस हलाखीची होत आहे. १९ जून रोजी महाराष्ट्रात आतापर्यंतचे सर्वाधिक ३,८२७ रुग्ण आढळून आले आहेत. याचदिवशी मुंबईतील सर्वाधिक बळींची संख्या ११४ इतकी नोंदवली गेली. १८ जूनपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला, तर राज्यातील एकूण करोना रुग्णांच्या संख्येत ५२.१८ टक्के वाटा एकट्या मुंबईचा आहे. मुंबई व एमएमआर क्षेत्राचा विचार केला, तर हा वाटा ७३.८५ टक्के इतका आहे. मुंबईचा मृत्यूदर हा ५.२७ टक्क्यांवर पोहोचला आहे,” असं फडणवीस यांनी पत्रात नमूद करत चिंता व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रातील मुद्दे…

“जून महिन्यातील गेल्या १८ दिवसांचा विचार केला, तर राज्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांच्या संख्येत ४३.८६ टक्के रुग्ण या १८ दिवसात वाढले आहे. मुंबईत ३६.८८ टक्के रुग्ण या १८ दिवसात वाढले आहेत. गेले तीन महिने सातत्यानं करोना बळींची संख्या लपविली जात होती. त्याबाबत आपल्याला सूचित केल्यानंतर एकाच दिवशी राज्यभरातील बळीची संख्या १३२८ इतकी वाढली. ही एक दिवसाची वाढ विचारात घेतली नाही, तरी बळींच्या संख्येत जूनच्या या १८ दिवसांत महाराष्ट्रात ३७.१६ टक्क्यांनी वाढ झाली असून, मुंबईत ती वाढ ३५.१६ टक्के इतकी आहे.”

“एकीकडे ही सर्व परिस्थिती असताना अजूनही मुंबईत करोना बळींची संख्या दडवली जात असल्याचं मी सातत्यानं आपल्या निदर्शनास आणून दिले आहे. माझी विनंती आहे की, याबाबत अतिशय पारदर्शीपणे आकडेवारी राज्यातील जनतेसमोर मांडली पाहिजे. मुंबई महापालिकेतील आकडेवारीबाबत तातडीनं लक्ष घालून मुंबईतील परिस्थितीबाबत स्पष्ट व पारदर्शी माहिती जनतेसमोर आणणे गरजेचे आहे.”

“आणखी एका गंभीर विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. मुंबईतील केईएम रुग्णालयातील अतिदक्षता विभागात सुमारे १० रुग्णांचा ऑक्सिजनची पातळी कमी झाल्यानं मृत्यू झाल्याची बाब उघडकीस आली आहे. करोनाच्या काळात ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या यंत्रांची निगा राखणे अतिशय आवश्यक आहे. यापूर्वीसुद्धा मे महिन्यात जोगेश्वरी येथील ट्रॉमा केअर रुग्णालयात १२ जणांना ऑक्सिजनच्या यंत्रणेतील बिघाडामुळे प्राणास मुकावे लागले. हे आरोग्य यंत्रणेतील गंभीर दोष दाखवितात. आपण स्वतः या सर्व प्रकारांत लक्ष घालावे आणि हे दोष दूर करावेत”, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.