मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर शिवसेना आमदारांना भावनिक साद घालत पुन्हा माघारी येण्याचं आवाहन केल्यानंतर आता शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी मुंबईमधील शिवसेनेच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका केली आहे. एकीकडे उद्धव ठाकरेंचे पुत्र आणि मुख्य प्रवक्ते शिवसैनिकांना वाटेल त्या शब्दांमध्ये बोलून अपमान करत आहेत. तर दुसरीकडे याच शिवसैनिकांना समेटाची हाक दिली जात आहे, याचा काय अर्थ घ्यायचा?, असा प्रश्न एकनाथ शिंदेंनी विचारलाय.

नक्की वाचा >> ‘काय झाडी… काय डोंगार… काय हाटील…’ने सोडवली पुणेकरांची मोठी समस्या; ही शक्कल पाहून तुम्हीही म्हणाल, ‘काय आयडीया…’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही. माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा असं उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना सांगितलं आहे. शिवसेना पक्षप्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुखांच्या या भावनिक आवाहनाला शिंदे यांनी ट्विटरवरुन उत्तर देताना उद्धव ठाकरेंचे पुत्र म्हणजेच मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचे प्रवक्ते म्हणजेच संजय राऊत हे बंडखोर आमदारांविरोधात वादग्रस्त भाषा वापरत असल्याचा मुद्दा उपस्थित करत उद्धव ठाकरेंनाच सवाल केलाय.

नक्की वाचा >> Maharashtra Political Crisis: मुंबईला कधी परत येणार? एकनाथ शिंदेंनी दिलं उत्तर; म्हणाले, “मुंबईला आम्ही…”

“एका बाजूला आपल्या पुत्राने व प्रवक्त्याने वंदनीय बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, जाहील व मृतदेह म्हणायचे, त्यांचा बाप काढायचा तर दुसऱ्या बाजूला मात्र हिंदूविरोधी महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी याच आमदारांना समेटाची हाक द्यायची, याचा अर्थ काय?,” असा प्रश्न शिंदे यांनी ट्विटरवरुन मुख्यमंत्र्यांच्या आवाहनावर विचारलाय. या ट्विटमध्ये शिंदे यांनी महाराष्ट्राची दिशाभूल करु नका अशा अर्थाचा हॅशटॅगही वापरला आहे.

नक्की वाचा >> एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीमध्ये असणारा ‘झाडी, डोंगार, हाटील’ फेम आमदार म्हणतो, “फडणवीसांच्या नावाने…”

नक्की वाचा >> महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या केंद्रस्थानी असणाऱ्या गुवहाटीमधील ‘रेडिसन ब्लू’ हॉटेलचा मोठा निर्णय; आता…

एकनाथ शिंदेंनी २१ जून रोजी बंड पुकारल्यापासून आतापर्यंत शिवसेनेचे ३९ आमदार त्यांच्या समर्थनार्थ गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. तर मागील काही दिवसांपासून संजय राऊत आणि आदित्य ठाकरे हे कठोर शब्दांमध्ये या बंडखोर आमदारांना लक्ष्य करताना दिसत आहेत. संजय राऊत यांनी या आमदारांचे मृतदेह परत येतील असं वादग्रस्त वक्तव्य करुन नंतर सारवा सारव केली. त्याचप्रमाणे आदित्य ठाकरेही शिवसैनिकांसोबतच्या मेळाव्यांमध्ये या आमदारांची तुलना नाल्याती्या घाणीशी केली. याचमुळे शिंदे आणि बंडखोर आमदार दुखावल्याचं शिंदेंच्या ट्विटवरुन लक्षात येत आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dont trick maharashtra tweets eknath shinde after cm uddhav thackeray emotional appeal to rebel mlas scsg
First published on: 28-06-2022 at 19:07 IST