अहिल्यानगरः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढवल्या जातील की नाही, हे आत्ताच सांगता येणार नाही, प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद बाजूला ठेवून पक्षवाढीचे काम करावे, असे आवाहन आमदार काशिनाथ दाते यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) वतीने राज्यात स्वाभिमान मंगल कलश यात्रा सुरू करण्यात आली आहे. ३० एप्रिलला यात्रेचे शिर्डी येथे आगमन होणार असून, त्याच्या स्वागताच्या नियोजनासाठी जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी आमदार दाते बोलत होते. शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, माणिक विधाते, अण्णासाहेब शेलार, प्रशांत गायकवाड, संजय कोळगे, क्षितिज घुले, संतोष धुमाळ, सुरेश बनसोडे, दत्तात्रय पानसरे, आशा निंबाळकर, सचिन ढेरे, अंकुश गर्जे, साईनाथ भगत आदी उपस्थित होते.
मंगल कलश यात्रेची माहिती देताना जिल्हाध्यक्ष सावंत यांनी सांगितले की, ३० एप्रिलला शिर्डी येथे यात्रेचे आगमन होईल. तेथे प्रवरा व गोदावरी नदीतील पाणी कलशांमध्ये टाकले जाईल. शनिशिंगणापूर येथील माती कलशांमध्ये जमा केली जाईल. अहिल्यानगर शहरात आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाजवळ कलश यात्रेचे स्वागत होणार आहे. त्यानंतर कलश यात्रा पारनेरकडे रवाना होईल. पारनेर येथे यात्रेचा समारोप होईल. त्यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे, मंत्री नरहरी झिरवळ, माजी आमदार अनिल भाईदास उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शहर जिल्हाध्यक्ष बारस्कर यांनी सांगितले की, माजी आमदार अरुण जगताप यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असल्यामुळे शहरात यात्रेचे वाजत गाजत स्वागत केले जाणार नाही. आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाजवळ शहरातील कार्यकर्ते स्वागत करतील. यावेळी ज्येष्ठ नेते अरुण जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी, यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली.