राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली होती. त्यावर आता महाराष्ट्र काँग्रेसने एक पोस्ट लिहून पार्थ अजित पवारांना उत्तर दिलं आहे. सुनेत्रा पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढत आहेत. अजितदादांच्या निधनानंतर ही जागा रिक्त झाली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपाचा प्रयत्न होता. मात्र काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिला आहे. त्यामुळे पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली. ज्यावर आता काँग्रेसने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र काँग्रेसची पोस्ट काय?
धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पूर्वपुण्याईवर आताच खासदार झालेल्या मुलाने काँग्रेस पक्षाच्या डाऊनफॉल बद्दल बोलणं, म्हणजे जरा जास्तच नाही का झालं? स्वतःच्या वडिलांच्या संशयास्पद अपघाती मृत्यूनंतर लगेच जमीन घोटाळ्यातील चौकशीतून बचावासाठी राजकीय सोय म्हणून शांत राहणाऱ्या, महाशक्तिसमोर सरेंडर झालेल्या या कृतघ्न मुलाने काँग्रेस पक्षाबद्दल न बोललेलंच बरं राहील.या मुलाच्या वडिलांना न्याय मिळवून देण्यासाठी कर्नाटक सरकारने त्यांच्या राज्यात FIR नोंद करून घेतला, तिथे सरकार काँग्रेस पक्षाचे आहे, काँग्रेस पक्षाचेच बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील अधिकृत उमेदवार त्या संशयास्पद अपघाताचा महाराष्ट्रात गुन्हा नोंद करा, निवडणूकीतून माघार घेईन, अशी मागणी करत आहेत. यावरही या कृतघ्न मुलाने बोलायला हवे ?
खासदार पार्थ पवार काय म्हणाले होते?
बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवार दिल्याच्या संदर्भात बोलताना खासदार पार्थ पवार यांनी म्हटलं होतं की, “माझं कुणाशीही बोलणं झालं नाही. पण त्यांनाच कळायला पाहिजे काय-करायचं काय नाही. काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी बोलण्याची गरज मला नाही वाटत. कारण सर्वांना माहिती आहे ते काय करत आहेत? सगळे मोठे लोक आहेत, त्यामुळे काय चाललंय हे सर्वांना समजतं. त्यांनी जो विचार केला असेल तो विचार त्यांना करूद्या”, असं खासदार पार्थ पवार यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु आहे-पार्थ पवार
“त्यांना (काँग्रेसला) नंतर महाराष्ट्रात काय त्रास होणार हे त्यांना दिसेल. कारण असं आहे की लोक विसरत नाहीत. अजितदादा यांच्याबाबत लोकांच्या मनात प्रेम आहे. अशा वेळी एवढ्या मोठ्या पक्षाने असा निर्णय घेणं हे अतिशय चुकीचं आहे. मला वाटतं की आपण कोणाला थांबवू शकत नाहीत. त्यामुळे जशी वेळ येते तसं सामोरं जावं लागत असतं. आम्ही देखील त्या पद्धतीने समोरं जाऊ. आम्ही कोणालाही फोन करणार नाही. जे काय नशिबात असेल ते होईल. पण मला याचं वाईट वाटतं की महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू आहे”,
