यवतमाळ वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळींच्या ५ शिक्षण संस्थांवर ईडीने कारवाई केली आहे. ईडीकडून या ठिकाणी कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर ईडीचं पथक जिल्ह्यात दाखल झालं आहे. पाचही शिक्षण संस्थांच्या अधिकाऱ्यांनी ईडीकडून चौकशी सुरु आहे. काही दिवसांपूर्वी किरीट सोमय्या यांनी वाशिमचा दौरा केला होता. वाशिमच्या देगाव, शिरपूर आणि इतर तीन ठिकाणी या पाच संस्था आहेत. मागील वर्षी ५ कोटी चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हे प्रकरण समोर आलं होतं. भावना गवळी विदर्भातील शिवसेनेच्या नेत्या आहेत. आतापर्यंत त्या पाच वेळा यवतमाळ वाशिम मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत.

२००६ चं प्रकरण बालाजी पार्टीकल बोर्ड सहकारी संस्था म्हणून उभं करण्यात आलं होतं. गवळींच्या निकटवर्तीयांनी हे खरेदी केल्याचा दावा करण्यात आला होता. २०११ मध्ये मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. यात मोठा गैरव्यवहार झाला असा आरोप करण्यात आलेला.

दुसरीकडे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी खासदार भावन गवळी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करत आहे. भावना गवळीच्या टीमने १०० कोटींची लूट नाही, तर माफियागिरी चालवली आहे. १८ कोटी रुपये रोख भावना गवळी यांनी विविध संस्थांमधून काढले आहेत आणि ७ कोटींची चोरी झाल्याचं असं प्रकार आहे. केंद्र सरकारचे ४४ कोटी, स्टेट बँकेचे ११ कोटी रुपये यांनी बालाजी कारखाना बनवला ५५ कोटींमध्ये. आणि स्वत:च्या भावना एग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने फक्त २५ लाख रुपये देऊन काबीज घेतला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेना फक्त एवढंच काम करत आहे. भावना गवळींच्या विविध संस्थांची चौकशी सुरु आहे. मी ईडीच्या या कारवाईचं स्वागत करत आहे.”, असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना केला.

उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेची टीम लूटमार करतेय : किरीट सोमय्या

कोण आहेत भावना गवळी?

भावना गवळी यांनी वयाच्या २४ व्या वर्षी लोकसभेत प्रवेश केला होता. यानंतर २००४, २००९, २०१४ आमि २०१९ असा सलग पाचवेळा त्यांनी लोकसभेत विजय मिळवाला. माजी खासदार स्व. पुंडलिकराव गवळी यांच्याकडून भावना गवळी यांना राजकारणाचे बाळकडू मिळाले. पुंडलिक गवळी यांच्या त्या सर्वात लहान कन्या आहेत. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी लहान वयातच राजकारणात प्रवेश केला. या कालावधीत त्यांनी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील अनेक समस्या सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे लोकांनी त्यांना भरभरून मतं दिली.