वितळलेले लोखंड पडल्याने जालन्यामध्ये आठ कामगार मृत्युमुखी

लक्ष्मण राऊत, लोकसत्ता

जालना : येथील अतिरिक्त औद्योगिक वसाहतीमधील ‘ओम साईराम स्टील्स अ‍ॅण्ड अलॉय’ या कारखान्यात वितळलेले लोखंड अंगावर पडल्याने आठ कामगार मृत्युमुखी पडल्यामुळे बांधकामासाठी आवश्यक असलेल्या लोखंडी सळ्या उत्पादित करणाऱ्या कारखान्यांतील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या तयार करणारे जालना हे राज्यातील प्रमुख केंद्र आहे. भंगार लोखंड वितळवून त्यापासून प्रारंभी ‘बिलेट’ म्हणजे पट्टय़ा तयार केल्या जातात आणि नंतर त्यापासून ‘रि-रोलिंग मिल्स’मधून बांधकामासाठी लागणाऱ्या सळ्यांचे उत्पादन होते. ‘बिलेट’ तयार करणारे आठ प्रकल्प सध्या जालना येथे चालू असून चार बंद आहेत, तर लोखंडी सळ्या उत्पादित करणाऱ्या २५ रि-रोलिंग मिल्सपैकी २२ सुरू आहेत. जालना येथील हा उद्योग नेहमीच औद्योगिक सुरक्षा आणि वायू प्रदूषण या दोन मुद्यांवरून टीकेचा विषय राहिलेला आहे. या संदर्भात वेळोवेळी सरकारदरबारी तक्रारीही झालेल्या आहेत.

अलीकडेच ‘ओम साईराम स्टील्स अ‍ॅण्ड अलॉय’ या उद्योगात वितळलेले लोखंड अंगावर पडून ११ कामगार जखमी होऊन त्यापैकी आठ मृत्युमुखी पडले. मृत आणि जखमी सर्व कामगार प्रामुख्याने उत्तर भारतातून आलेले आहेत. यापैकी नऊ जणांचे वय १९ ते २५ वर्षांच्या दरम्यान आहे. दुर्घटनेमुळे या उद्योगातील कामगारांच्या सुरक्षेच्या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

यापूर्वीही लोखंडी सळ्या उत्पादित करणाऱ्या कारखान्यांत लहान-मोठय़ा दुर्घटना होऊन अनेक कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत. मागील वर्षभरात १८ दुर्घटना घडून त्यामध्ये ११ कामगार मृत्युमुखी, तर २३ कामगार कायमचे अपंग झाले आहेत. १९८१ मध्ये स्वतंत्र जालना जिल्हा अस्तित्वात आल्यानंतर जालना शहरात या उद्योगाची वाढ झाली. त्यामुळे बी-बियाणे उद्योग आणि व्यापार-उदिमासाठी प्रसिद्ध असलेले जालना शहर बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळ्या उत्पादित करणारे केंद्र म्हणूनही राज्यात तसेच राज्याबाहेर ओळखले जाऊ लागले. मोठी आर्थिक उलाढाल असणाऱ्या या उद्योगात प्रत्यक्ष रोजगार आणि त्यावर अवलंबून असलेला मालवाहतूक तसेच लोखंडी भंगार खरेदी-विक्रीचा व्यवसायही मोठा आहे.

लोखंडी सळ्या उत्पादकांना जालना शहरातील एकूण आर्थिक उलाढालीत मोठे महत्त्व आहे. राजकीय, धार्मिक, सामाजिक सर्वच क्षेत्राशी संबंध असणाऱ्या या मंडळींचा सरकार दरबारीही संबंध असतो. प्रभावशाली सत्ताधारी राजकीय किंवा विरोधक या सर्वाशी जमेल त्या पद्धतीने आणि जमेल तेवढे जुळवून घेऊन हे उद्योजक वाटचाल करीत असतात. परंतु औद्योगिक सुरक्षा आणि वायू प्रदूषणाच्या तक्रारींचे धुके या उद्योगाभोवती मात्र कायमच राहत आलेले आहे. ‘ओम साईराम स्टील्स अ‍ॅण्ड अलॉय’ या उद्योगातील दुर्घटनेमुळे औद्योगिक सुरक्षा आणि त्या संदर्भातील निष्काळजीबद्दलचा विषय पुन्हा एकदा चर्चेस आला आहे.

राज्याच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभागाचे साहाय्यक संचालक राम दहिफळे यांनी दुर्घटना झालेल्या उद्योगाची पाहणी केली. कारखाने अधिनियमातील तरतुदीनुसार अशा घटनांची तपासणी करून त्या संदर्भात चौकशी अहवाल तीन महिन्यांच्या आत शासनास सादर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी ‘लोकसत्ता’स सांगितले. जालना जिल्हा प्रशासनाने या संदर्भातील आपला अहवाल शासनाकडे पाठविला आहे.

मालकांना अटक आणि जामीन

आठ कामगार मृत्युमुखी आणि तीन जखमी झाल्यामुळे सदोष मनुष्यवध आणि निष्काळजीपणा केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी कारखान्याचे मालक राजेंद्र सत्यनारायण भारुका, जवाहर शंकरलाल डेम्बडा यांच्यासह एकूण सहा जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्या सर्वाना वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, ‘ओम साईराम स्टील्स अ‍ॅण्ड अलॉय’ उद्योगाच्या व्यवस्थापनाने मृत्युमुखी पडलेल्या आठ कामगारांच्या वारसांना प्रत्येकी ११ लाख रुपयांची मदत आणि कुटुंबातील एकास कायमस्वरूपी नोकरी देणार असल्याचे जाहीर केले आहे.

जालना शहरातील लोखंडी सळ्या तयार करणाऱ्या उद्योगात यापूर्वी अनेक दुर्घटना घडून कामगार मृत्युमुखी पडलेले आहेत. या उद्योगातील सुरक्षा आणि कामगार कायद्याच्या पायमल्लीकडे आम्ही यापूर्वीही अनेक तक्रारी केल्या आहेत. उत्तर प्रदेश, बिहार राज्यातून मोठय़ा प्रमाणावर आलेल्या या कामगारांना कायद्याचे संरक्षण दिले जात नाही. ९० टक्क्य़ांपेक्षा अधिक कामगार परप्रांतीय असले तरी सरकार दरबारी मात्र स्थानिकांना रोजगार मिळाल्याचे सांगण्यात येते. असंख्य कामगार अकुशल असतात. लोखंड वितळविण्यासाठी लागणाऱ्या १६०० अंश तापमानावर त्यापैकी अनेक जण काम करतात. या उद्योगातील कामगारांच्या सुरक्षेकडे लक्ष दिले जात नाही.

-अण्णा सावंत, सचिव, महाराष्ट्र राज्य ‘सीटू’