एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केली असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे जवळपास ४० आमदार आहेत. हिंदुत्वासाठी कोणतीही तडजोड आम्हाला मान्य नाही, असे म्हणत शिंदे यांनी बंड पुकारले आहे. उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना परत येण्याचे आवाहन करुनही ते परतण्याची सध्यातरी शक्यता नाही. याच कारणामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत सापडले आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करुन बंडखोरी का केली याबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. हिंदुत्वाच्या विचारासाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण आलं तरी बेहत्तर, असे म्हणत त्यांनी महाविकास आघाडीसोबत सत्तेत सामील होण्यास विरोध दर्शविला आहे.

हेही वाचा>>> मोठी बातमी! बंडखोर आमदार निलंबनाच्या मागणीविरोधात शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात याचिका, उद्या होणार सुनावणी

“मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? यालाच विरोध म्हणून हे पाऊल उचलले आहे. हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांसाठी आणि बाळासाहेबांची शिवसेना वाचविण्यासाठी आम्हाला मरण जरी आलं तरी बेहत्तर. तसे झाल्यास आम्ही सारे आमचं भाग्य समजू,” असे एकनाथ शिंदे ट्वीटच्या माध्यमातून म्हणाले आहेत.

हेही वाचा>>> नरहरी झिरवळांच्या नोटिशीला बंडखोर आमदार उत्तर कधी देणार? दीपक केसरकर यांनी नेमकं सांगितलं, म्हणाले…

दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या बंडाविरोधात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली असून कायदेशीर लढाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर १६ आमदारांचे निलंबन रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने केली आहे. तसेच शिंदे यांना हटवून शिवसेनेने अजय चौधरी यांची गटनेतेपदी नेमणूक करण्यात आली आहे. त्यानंतर आता एकनाथ शिंदे गटानेही न्यायालयाचे दार ठोठावले असून या दोन्ही निर्णयाला विरोध दर्शविणारी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात २७ जून रोजी सुनावणी होणार आहे.