शिवसेनेत आजपर्यंतची सर्वात मोठी बंडखोरी करत एकनाथ शिंदेंनी भाजपासमवेत आघाडी केली आणि राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. तेव्हापासून दोन्ही गटांमध्ये जोरदार कलगीतुरा सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सत्तास्थापनेबाबत, बंडखोरीच्या कारणांबाबत वेगवेगळे दावे करत आरोप केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर ‘लोकसत्ता’शी बोलताना भूमिका मांडली आहे. “शिवसेना ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही”, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. तसेच, आपले बंड हे अजित पवारांच्या बंडापेक्षा वेगळे होते, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. त्यांनी त्यांच्या शैलीत या बंडांमधला फरक सांगितला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“सगळ्यांच्या मेहनतीतून शिवसेना मोठी झाली”

बंडखोरीबाबत विचारणा केली असता एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंला लक्ष्य केलं. “आम्ही काही दुसऱ्या पक्षात गेलो नाही. आम्ही दुसरा पक्ष काढलेला नाही. शिवसेना ही काही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही. सगळ्यांनी मिळून उभी केलेली ही शिवसेना आहे. सगळ्यांच्या मेहनतीतून मोठी झालेली शिवसेना आहे. बाळासाहेबांचे विचार आमच्यापासून कुणी हिरावून घेऊ शकतं का? बाळासाहेबांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला जवळ करू नका म्हटलं. केलं कुणी? आम्ही त्यांच्यापासून फारकत घेतली”, असं एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

“२०१९मध्ये मला विचारणा झाली होती”

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन होण्यापूर्वी २०१९मध्ये आपल्याला विचारणा झाली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ शिंदेंनी यावेळी केला. “तेव्हा मला विचारणा झाली होती. काही जणांनी माझ्याशी संपर्कही केला होता. पण तेव्हा उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचं होतं. म्हटलं, जाऊ दे, त्यांची मुख्यमंत्रीपदाची हौस फिटू दे”, असा टोला शिंदेंनी लगावला. “५० आमदार बाहेर घेऊन पडल्याने आज देशातच काय, देशाबाहेर जगातही माझे नाव झाले आहे. तेव्हा मुख्यमंत्री झालो असतो तर आज झाले तेवढे माझे नाव झाले नसते. आम्ही ‘परफेक्ट’ कार्यक्रम केला”, असं ते यावेळी म्हणाले.

Video : “तेव्हाच शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देऊ केलं होतं, पण मला…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा खुलासा!

अजित पवारांचं बंड आणि शिंदे गटाचं बंड यातला फरक!

२०१९मध्ये अजित पवारांनी बंड करत भल्या सकाळी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी उरकला होता. त्यानंतर अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत त्या शपथविधीची चर्चा सुरू होती. मात्र, त्यांचं बंड फसलं आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील ७८ तासांचं सरकार कोसळलं. पण अजित पवारांच्या बंडाप्रमाणेच आपलं बंडही अपयशी ठरेल, असं वाटलं होतं का? अशी विचारणा यावेळी मुलाखतीमध्ये एकनाथ शिंदेंना करण्यात आली. त्यावर बोलताना शिंदेंनी खोचक शब्दांत प्रतिक्रिया दिली.”या दोन्ही बंडांमध्ये एक मुख्य फरक आहे. तेव्हा अजित पवार होते. यावेळी एकनाथ शिंदे होते”, असं ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath shinde explains difference in ajit pawar rebel in 2019 and shinde group mla stand pmw
First published on: 25-09-2022 at 13:15 IST