राज्यातील सत्ता गेल्याचा धक्का सुप्रियाताई अजून पचवू शकलेल्या नाहीत, त्यामुळे त्यांची स्मरणशक्तीसुध्दा कमी झालेली दिसतेय. त्यांची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी त्यांना एखादे टॉनिक आम्ही लवकरच पाठवू असं प्रत्युत्तर शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी सुप्रिया सुळेंना दिले आहे. गेल्या दीड दोन महिन्यात महाराष्ट्राची प्रचंड बदनामी झाली असे वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केल्याच्या मुद्द्यावरुन म्हस्के यांनी टीका केली आहे.

नक्की वाचा >> मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये फोनवरुन बाचाबाची?

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात झालेल्या अटकेच्या कारवाईचा तसेच माजी मंत्री नवाब मलिक यांना झालेल्या अटकेचा संदर्भ देत शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी सुप्रिया सुळेंवर टीका केली आहे. “राज्याचा गृहमंत्री भष्टाचाराच्या आरोपाखाली गजाआड गेला, मोस्ट वॉन्टेड गुंड दाऊद इब्राहीमशी लागेबांधे असल्याच्या मुद्यावरुन एका मंत्र्याच्या हातात बेड्या पडल्या. आजही ही मंडळी तुरुंगातच आहेत. त्यांच्या काळ्या धंद्यांनी महाराष्ट्राची देशभरात बदनामी झाली नव्हती का?” असा प्रश्न म्हस्के यांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> ‘पवारांना तीन अंकी आमदार निवडून आणता आले नाहीत’ म्हणणाऱ्या पडळकरांना राष्ट्रवादीचं उत्तर; म्हणाले, “बारामतीत…”

विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याशी संबंधित असलेल्या सिंचन घोटाळ्याबरोबरच अशोक चव्हाण यांच्याशी संबंधित असणाऱ्या ‘आदर्श’ घोटाळ्याचाही उल्लेख शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी केला आहे. “राज्यात जेव्हा सिंचन घोटाळा उघडकीस आला तेव्हा महाराष्ट्र बदनाम झाला नव्हता का? आदर्श घोटाळ्यात एका मुख्यमंत्र्याला राजीनामा द्यावा लागला तेव्हा राज्य बदनाम झाले नव्हते का?” असा प्रश्न म्हस्के यांनी विचारला आहे.

नक्की वाचा >> “पंकजा मुंडे भाजपाला सोडचिठ्ठी देतील, त्या राष्ट्रवादीत येत असतील तर…”; सुप्रिया सुळेंचा उल्लेख करत आमदाराचं विधान

“बॉम्बस्फोटामध्ये असंख्य मुंबईकरांनी प्राण गमावल्यानंतर बड़े देशोमें ऐसी छोटी मोटी बाते होती है|असे म्हणून जखमांवर मिठ चोळणाऱ्या माजी गृहमंत्र्यांच्या वक्तव्यांमुळे महाराष्ट्राची बदनामी झाली नव्हती का? राज्याच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचे कुख्यात गुंड दाऊद इब्राहीमशी लागेबांधे असल्याची चर्चा काही वर्षांपूर्वी तेजीत होती. तेव्हा महाराष्ट्राची प्रतिमा डागाळली नव्हती का?” असे प्रश्न म्हस्के यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना विचारले आहेत.