मुंबईत झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. कसाबसह दहा दहशतवाद्यांनी मुंबईत येऊन हल्ला केला होता. या हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो लोक जखमी झाले होते. हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळसकर असे तीन महत्त्वाचे पोलीस अधिकारी, मेजर संदीप उन्नीकृष्णन, पोलीस हवालदार तुकाराम ओंबाळे यांच्यासह अनेक वीर या हल्ल्यात शहीद झाले. या हल्ल्याच्या आठवणी आजही मुंबईकरांच्या मनात घर करुन राहिल्या आहेत. दरम्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही २६/११ चा दिवस हा मुंबईच्या इतिहासातला काळा दिवस होता असं म्हटलं आहे.
काय म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
संविधान दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं आणि त्यावरच आपला देश वाटचाल करतो आहे. संविधान दिन साजरा करण्याची सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली, मी त्यांचंही अभिनंदन करतो. काही लोक संविधानाच्या कोऱ्या पुस्तिका दाखवत सगळीकडे फिरतात त्यांनी थोडा बोध घेतला पाहिजे असा टोला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राहुल गांधींना लगावला.
२६/११ चा हल्ला हा मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस-एकनाथ शिंदे
२६/११ चा मुंबईवर झालेला हल्ला हा मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस होता. मी शहिदांना अभिवादन करतो आणि ज्या निरपराध लोकांचा बळी गेला आहे त्यांना आदरांजली अर्पित करतो. विदर्भात मी मंगळवारपासून प्रचार करतो आहे. अनेक सभांना मी उपस्थित होतो. लाडक्या बहिणींमध्ये प्रचंड उत्साह जाणवला. लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, तरुण,ज्येष्ठ सगळेच सभेत मोठ्या प्रमाणावर येत होते. जे उमेदवार आहेत त्यांच्या पाठिशी ही जनता उभी आहे. नगरपालिका आणि नगरपंचायत या नगरविकास खात्याच्या अख्यत्यारीत येतात. जिथे नगराध्यक्ष नव्हता आणि किंवा नगरसेवक नव्हते तिथेही आम्ही निधी दिला आहे. त्यामुळे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा निर्णय आम्ही टीम म्हणून घेतला होता-एकनाथ शिंदे
लाडकी बहीण योजना सुरु करण्याचा निर्णय मी मुख्यमंत्री होतो. आमच्या टीमने मिळून हा निर्णय घेतला. एकदा आम्ही निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी करायची हे ठरवलं आणि लाडकी बहीण योजना सुरु झाली. देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि मी आम्ही तिघांनी मिळून हा निर्णय घेतला. शिवाय लाडक्या बहिणींना आम्ही हा शब्द दिला आहे की ही योजना कधीही बंद होणार नाही असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.नगरपरिषद, नगरपंचायती यांच्या निवडणुका आहेत. नगरविकास खात्याच्या माध्यमांतून छोट्या शहरांचा विकास झाला पाहिजे हे आमचं लक्ष्य आहे. असंही एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
