हर्षद कशाळकर अलिबाग : रायगड जिल्ह्यात १ लाख ६ हजार हेक्टरवर यंदा खरिपाच्या लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यात प्रामुख्याने भात, नागली आणि तूर पिकांचा समावेश आहे. जिल्ह्यात भाताची उत्पादकला वाढविण्यावर यंदा भर दिला जाणार आहे. त्यासाठी कृषी विभागाने तयारी पुर्ण केली आहे. रायगड जिल्ह्यात १ लाख ०६ हजार २६३ एवढे भात लागवडीचे क्षेत्र आहे. गेल्या वर्षी ९४ हजार ४३६ हेक्टरवर भाताची लागवड करण्यात आली होती. यंदाही १ लाख हेक्टरवर भात पिकाची लागवड अपेक्षित आहे. गेली दोन वर्षे अतिवृष्टी आणि वादळांमुळे जिल्ह्यातील भाताची उत्पादकता कमी झाली होती. या वर्षी त्यात वाढ करण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. याशिवाय जिल्ह्यात ५ हजार १८७ हेक्टर नागली पिकाखालील क्षेत्र आहे. यातील ३ हजार ६४० हेक्टरवर यंदा नागली पिकांची लागवड अपेक्षित आहे, तर २ हजार ४१५ हेक्टरवर तूर लागवड अपेक्षित आहे. यंदाच्या खरीप हंगामासाठी २५ हजार १०० क्विंटल बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. यात २२ हजार ७५० क्विंटल सुधारित, तर २५० क्विंटल संकरित भात बियाण्यांचा समावेश आहे. खरीप हंगामासाठी २० हजार ०२० मेट्रिक टन खतांची मागणी शासनाकडे रायगड जिल्हा कृषी विभागाने केली आहे. कृषी निविष्ठांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. करोनाच्या दुसऱ्या लाटेतून रायगड आता हळूहळू बाहेर पडू लागला आहे. शेतकरीदेखील कामाला लागला आहे. पावसाळय़ापूर्वीची मशागतीची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. दक्षिण रायगडात धूळपेरणीची कामे सुरू झाली आहेत. बांधबंदिस्ती, चर मारणे, तसेच शेतीच्या मशागतीची कामेदेखील सुरू झाली आहेत. शेतकऱ्यांना प्रोत्साहन.. शेती क्षेत्रात होणारी घट लक्षात घेऊन कृषी विभागाने शेतीची उत्पादकता वाढविण्यावर भर दिला आहे. शेतकऱ्यांनी सुधारित आणि संकरित बियाणे घेण्यासाठी तसेच आधुनिक पीक लागवड पद्धतीचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. गेल्या वर्षी भाताची उत्पादकता हेक्टरी २ हजार ३४६ होती. या वर्षी प्रति हेक्टरी २ हजार ८१५ किलोग्रॅम उत्पादकता घेण्याचे उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवले आहे. खतांच्या उपलब्धतेची माहिती ऑनलाइन जिल्ह्यात ५ हजार मेट्रिक टन खते, तर तीन हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले आहे. येत्या काही अजून बियाणे आणि खते उपलब्ध होणार आहेत. खतांच्या उपलब्धतेबाबत माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी यासाठी रायगड जिल्हा परिषदेने ऑनलाइन पोर्टल विकसित केले आहे. खतांची उपलब्धता आणि साठा याची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना या माध्यमातून मिळू शकणार आहे. शेती क्षेत्र घटले जिल्ह्यात वाढते औद्योगिकीकरण, शहरीकरण, शेतमजुरांची कमतरता या वेळी दरवर्षी भातलागवडीखालील शेती क्षेत्रात घट होत आहे. भात लागवडीचे क्षेत्र १ लाख २४ हजार हेक्टरवरून १ लाख ६ हजार हेक्टवर येऊन ठेपले आहे. शेती क्षेत्रातील घट चिंताजनक आहे. शेतकरी शेतीपासून दुरावत चालल्याचे यातून दिसून येत आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना बियाणे आणि खतांचा तुटवडा जाणवू नये यासाठी नियोजन करण्याचे निर्देश कृषी विभागाला दिले आहेत. शेतकऱ्यांना संकरित आणि सुधारित बियाणे उपलब्ध व्हावे यावर भर देण्याच्या सूचनाही खरीप आढावा बैठकीत देण्यात आल्या आहेत. - आदिती तटकरे, पालकमंत्री रायगड