करोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. दुसरीकडे राज्यात राज्यात ऑगस्टमध्ये १७ हजार ३७२ बेरोजगारांना रोजगार दिल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यामध्ये रोजगार मिळवून देण्यात आला आहे. महास्वयंम वेबपोर्टल, ऑनलाईन रोजगार मेळावे आदी विविध उपक्रमांद्वारे राज्यात नोकरीइच्छूक उमेदवार आणि विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांची सांगड घालून रोजगार उपलब्ध करुन देण्यात येतो. विविध उपक्रमांमधून मागील वर्षी २०२० मध्ये राज्यात १ लाख ९९ हजार ४८६ उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात यश आला होता. तर चालू वर्षात जानेवारी ते ऑगस्टअखेर १ लाख ११ हजार ०८३ बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यात आला आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

“बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतीसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. नोकरीइच्छूक उमेदवारांनी या वेबपोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. विभागामार्फत जिल्ह्यांमध्ये वेळोवेळी ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचेही आयोजन करण्यात येते.”, असं मंत्री नवाब मलिक यांनी सांगितलं.

नोंदणीकृत उद्योगांमध्ये नोकरीची संधी

महास्वयंम वेबपोर्टलवर आतापर्यंत ९१ हजार ०९१ इतक्या सार्वजनिक व खासगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. यापैकी अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयंम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. त्यामुळे नोकरी इच्छूक उमेदवारांना कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून नोकरी मिळविण्यासाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध झाले आहे, असे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले.

मुंबईत ऑगस्टमध्ये ६ हजार १९० बेरोजगारांना रोजगार

मंत्री नवाब मलिक म्हणाले की, ऑगस्ट २०२१ मध्ये विभागाकडे ३९ हजार ५७४ इतक्या नोकरी इच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात ९ हजार २१६, नाशिक विभागात ६ हजार १८०, पुणे विभागात १० हजार ९८०, औरंगाबाद विभागात ८ हजार १०९, अमरावती विभागात २ हजार ७४० तर नागपूर विभागात २ हजार ३४९ बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली. ऑगस्टमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे १७ हजार ३७२ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक ६ हजार १९०, नाशिक विभागात २ हजार १६८, पुणे विभागात ४ हजार ६२९, औरंगाबाद विभागात ३ हजार ७३८, अमरावती विभागात ४४९ तर नागपूर विभागात १९८ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.