एकापेक्षा अधिक बायका करणं भारतात कायद्यानं गुन्हा आहे. पूर्वी देशात बहुपत्नीत्व ही सामाजिक प्रथा असायची. पण स्वातंत्र्यानंतर यावर बंदी घालण्यात आली आणि प्रत्ये महिलेला सन्मानानं जगण्याचा हक्क बहाल करण्यात आला. असं असलं तरी महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात बहुपत्नीत्व ही प्रथा पुन्हा एकदा फोफावत आहे. याला मुख्य कारण पाणीटंचाई आहे. मुंबईपासून १८५ किमी अंतरावर असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील डेंगणमाळ गावातील पुरुषांना एकापेक्षा अधिक बायका आहेत. खडकाळ जमिनीवर वसलेल्या या गावची लोकसख्या ५०० इतकी आहे. पण या गावातील घरांना अद्याप नळजोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे भर उन्हाळ्यात या भागात तीव्र दुष्काळ पडतो. लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. पिण्याच्या पाण्यासाठी त्यांच्याकडे विहीर आणि भातसा धरण हे दोनच पर्याय आहे. पण पाण्याचे दोन्ही स्त्रोत इतके दूर आहेत, की ये-जा करण्यासाठी त्यांना सुमारे 12 तास लागतात. त्यामुळे बायकांना घरातील कामांसाठी वेळच मिळत नाहीत. हीच गरज लक्षात घेऊन डेंगणमाळ गावातील पुरुषांनी 'पाण्यासाठी लग्न' करायला सुरुवात केली आहे. या गावातील पुरुषांना एकापेक्षा अधिक बायका असणं सामान्य बाब बनली आहे. देशात बहुपत्नीत्वाला बंदी असून देखील गावकऱ्यांनी सोयीस्करपणे कायद्याला बगल दिली आहे. पहिली बायको घरातील कामकाज, मुलांचं संगोपन आणि स्वयंपाक आदी कामं करतात. तर दुसऱ्या बायकोकडे केवळ घरासाठी पाणी पुरवण्याची जबाबदारी असते. उन्हाळ्यात डेंगणमाळ गावात उष्णता इतकी तीव्र असते की आसपासच्या सर्व विहिरी कोरड्या पडतात. पाण्यासाठी व्याकूळ झालेली गुरं तडफडून मरतात. अशा स्थितीत दैनंदिन कामं, मुलांचं संगोपन आणि पाण्याची जबाबदारी पार पाडणं एका महिलेलं शक्य नसतं. त्यामुळे गावकऱ्यांनी यावर बहुपत्नीत्वाचा घृणास्पद उपाय अवलंबला आहे. विशेष म्हणजे दुसऱ्या बायकोचं काम फक्त घरासाठी पाणी आणणं हाच आहे. त्यांना गावात 'पाणी बाई' म्हणून संबोधलं जात. २०१५ मध्ये प्रकाशित झालेल्या ओपन मॅगझिनच्या लेखानुसार गावातील काही पुरुषांना चार-चार बायका आहेत. यामध्ये एक कायदेशीर बायको तर इतर बायका 'पाणी बाई' आहेत. विशेष म्हणजे पाणी बाईंना त्यांनी लग्न केलेल्या पुरुषावर कोणताही कायदेशीर अधिकार नाही. त्यांना संबंधित पुरुषासोबत वैवाहिक संबंध ठेवता येत नाहीत. घरातील कामात त्यांना काही बोलता येत नाही. तसेच बाळाला जन्म घालण्याचा अधिकारही त्यांना नाही. बहुतांशी वेळा संबंधित महिला या विधवा किंवा एकल माता असतात. केवळ गावात सन्मानानं वागवलं जावं म्हणून त्या अशाप्रकारे 'पाणी बाई' म्हणून विवाह करतात. त्यांना संबंधित घरात स्वतंत्र खोली आणि स्नानगृह दिलं जातं.