केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजपाची सत्ता येण्याबाबत आज केलेल्या राजकीय भविष्यवाणीवर राज्यातील तिन्ही सत्ताधारी पक्षांकडून प्रतिक्रिया देण्यात आली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक आणि शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर निशाणा साधला. तर , राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखी यावर मोजक्याच शब्दांमध्ये प्रतिक्रिया दिली आहे.

नारायण राणे यांनी महाराष्ट्रात पुन्हा भाजपाचं सरकार येईल, असं म्हटलेलं आहे. असं माध्यम प्रतिनिधीने फडणवीसांनी सांगून यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता, “मी ऐकलेलं नाही.” एवढंच फडणवीस हसून म्हणाले.

तसेच, फडणवीस व चंद्रकांत पाटील हे दिल्लीत पोहचल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे असं माध्यम प्रतिनिधींनी म्हटल्यावर फडणवीसांनी सांगितले की, “कुठल्या राजकीय चर्चेला उधाण आलंय याची मला कल्पना नाही. मी आणि चंद्रकांत पाटील भाजपाच्या संघटनात्मक बैठकीला इथे आलोय. आमचे संघटनमंत्री बीएल संतोष, शिवप्रकाश, सीटी रवी, मी आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील अशी आमची आज एकूणच संघटनेतील वाटचाल आणि त्याचा आढावा अशी बैठक होती. आम्ही चार-पाच तास त्याच बैठकीत होतो. त्यामुळे मला वाटत नाही की त्यापेक्षा वेगळा काही आमचा अजेंडा होता.”

नारायण राणेंच्या राजकीय भविष्यवाणीला नाना पटोले, नवाब मलिक आणि अनिल परब यांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

याचबरोबर, “अमित शाह आमचे नेते आहेत. आम्ही दिल्लीला आलो आणि अमित शाह हे असतील तर आम्ही त्यांची भेट घेतोच. त्यामुळे कुठलाही संघटनात्मक बदल नाही.” असंही फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं.

“सरकार पाडून नवं सरकार स्थापन करायचं असेल तर काही गोष्टी गुपित…”, नारायण राणेंची नवी राजकीय भविष्यवाणी

तर, विधान परिषदेच्या नागपूरच्या जागेवर भाजपा व काँग्रेस अशी लढत होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर बोलताना फडणवीस म्हणाले की, “काँग्रेसला अशी अपेक्षा आहे की नागपूरमध्ये ते काही चमत्कार घडवू शकतील. परंतु कुठलाही चमत्कार घडणार नाही. चंद्रशेखर बावनकुळे हे चांगल्या फरकाने नागपुरमध्ये निवडून येतील.”