चंद्रपूर : ब्रम्हपुरी लगतच्या अवळगाव येथे शनिवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास शेतकरी तुळशीराम सुकरू कांबळी (६७) उन्हाळी धान व मिरची पिकाला पाणी देण्याकरिता शेतात गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात कांबळी यांचा मृत्यू झाला. ब्रम्हपुरी पोलीस व वन विभागाने रात्री उशिरा घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. या घटनेमुळे ब्रम्हपुरी परिसरात वाघाची दहशत पसरली आहे. वन खात्याने पंचनामा करून मृतदेह कुटुंबाच्या सुपूर्द केला. मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ मदत निधी देण्यात आला.