सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करूनही शेतकऱ्यांपर्यंत ती अजूनही पोहोचली नाही. येत्या ८ दिवसांत शेतकऱ्यांना मदत न दिल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनता मोठय़ा संख्येने उपोषण सुरू करील, असा इशारा खासदार राजीव सातव यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बुधवारी सातव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला. आमदार डॉ. संतोष टारफे, जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, केशवराव चव्हाण, नारायणराव खेडकर, विनायकराव देशमुख यांच्यासह जि. प. व न. प.सदस्य उपस्थित होते. सातव यांनी केंद्र व राज्य सरकारांवर टीका केली. केवळ घोषणाबाजी करून जनतेची दिशाभूल करणारे हे सरकार असून त्यांनी निवडणूक काळात दिलेली आश्वासने पाळली नाहीत. आज मायबाप शेतकरी दुष्काळी स्थितीमुळे अडचणीत सापडला असताना सरकारने त्यांना मदत देण्याचे जाहीर केले. मात्र, अजूनही ही मदत शेतकऱ्यांच्या पदरात पडली नाही, असा आरोप केला. सकाळी अकरापासून संध्याकाळी पाचपर्यंत सुरू असलेल्या आंदोलनात भजन, भारुडाद्वारे केंद्र व राज्य सरकारांवर टीका केली. सातव यांनी हातात टाळ घेऊन भजनी मंडळीला साथ दिली.