संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराने भाजपाचा पराभव केला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत होती. यानंतर काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. भाजपाने मतदारांना अनेक प्रलोभनं दाखवली, धाकधपटशा केला, परंतु स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेने निर्भिडपणे मतदान केलं, असं मत बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलं.

बाळासाहेब थोरात म्हणाले, “कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाचा आणि महाविकासआघाडीचा विजय झालाय. काँग्रेसचे नेते आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील, त्यांना साथ देणारे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेतेमंडळी व कार्यकर्ते यांनी ज्या पद्धतीने एकत्रित काम केलं त्याचं निश्चितपणे कौतुक केलं पाहिजे. पुढील कालखंडात या राज्याच्या राजकारणाची दिशा कशी राहील हे ठरवणारा हा विजय आहे.”

“भाजपाने प्रलोभनं दाखवली, धाकधपटशा केला, परंतु…”

“आतापर्यंत महाविकासआघाडीने जनतेसाठी जे काम केलेलं आहे, शेतकऱ्यांसाठी जे काम केलेलं आहे त्याला जनतेने मतदान केलं आणि त्यांचा हा विजय आहे. खरं म्हणजे भाजपाने मतदारांना अनेक प्रलोभनं दाखवली जात होती, कधीकधी धाकधपटशा देखील केला जात होता. परंतु त्यामधून देखील स्वाभिमानी कोल्हापूरच्या जनतेने निर्भिडपणे हे मतदान केलं. त्याचं देखील या निमित्ताने मी खूप अभिनंदन करतो,” असंही बाळासाहेब थोरात यांनी नमूद केलं.

दरम्यान, काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असताना यापूर्वी या मतदारसंघात काँग्रेसकडून निवडणुकीत उतरलेले आणि आता भाजपाचे उमेदवार सत्यजीत कदम यांना भाजपने उमेदवारी दिली होती. गेले काही दिवस मविआ आणि भाजपाच्या राज्यभरातील प्रमुख नेत्यांच्या तोफा धडाडत राहिल्या. त्यामुळे आता या निकालाकडे सर्वाचेंच लक्ष लागले होते.

मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर दुसऱ्या फेरीपर्यंत काँग्रेसच्या जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या कसबा बावडा भागातून मतमोजणी सुरुवात झाल्यानंतर पहिल्या फेरीत काँग्रेसच्या जयश्री जाधव २१३७ मतांनी आघाडीवर होत्या. जयश्री जाधव यांना ४८५६ तर भाजपाच्या सत्यजित कदम यांना २७१९ मते मिळाली. दुसऱ्या फेरीत जयश्री जाधव यांना ५५१५ तर सत्यजित कदम यांना २५१३ मते मिळाली. तर तिसऱ्या फेरीमध्ये जाधव यांना ४९२८ तर सत्यजित कदम यांना २५६६ मते मिळाली. तिन्ही फेऱ्यानंतर जयश्री जाधव या ७५०१ मतांनी आघाडीवर होत्या.

चौथ्या फेरीनंतर जयश्री जाधव यांना ३७०९ तर सत्यजित कदम यांना ३९३७ मते मिळाली. तर पाचव्या फेरीनंतर कदमवाडी, जाधववाडी,भोसले वाडी या भागातून सत्यजित कदम यांनी आघाडी घेत ४१९८ मते मिळवली आहेत. मात्र पुन्हा सहाव्या फेरीमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसने आघाडी घेतली आहे. सहाव्या फेरीत जयश्री जाधव यांनी ४६८९ तर सत्यजित कदम यांनी २९७२ मते मिळवली.

दहाव्या फेरीमध्ये काँग्रेसच्या जयश्री जाधव यांना २८६८ तर सत्यजित कदम यांना ३७९४ मते मिळाली. अकाराव्या फेरीत जाधव यांना २८७० तर कदम यांना २७५६ मते मिळाली.

२०व्या फेरीनंतर काँग्रेसच्या जयश्री पाटील यांनी १५ हजार मतांची मोठी आघाडी घेतली होती. संभाजी नगर, पद्माला, मंगळवार पेठ या भागातील मतपेट्या उघडल्या नंतर जयश्री पाटील यांना ४३६६ तर सत्यजित कदम यांना ३०७४ मते मिळाली. दरम्यान चोविसाव्या फेरीअखेर जयश्री जाधव यांना १८ हजार ८३८ इतके मताधिक्य मिळाले होते. त्यानंतर जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांची आघाडी घेत विजय मिळवला आहे.

हेही वाचा : VIDEO: “दादा हिमालयात जावा,” चंद्रकांत पाटलांसमोर कार्यकर्त्यांच्या घोषणा; संताप पाहून माघारी फिरण्याची वेळ

“कोल्हापूरच्या जनेतेने शब्द पाळला आहे. चंद्रकांत जाधव यांच्या नंतर माझी जी जबाबदारी घेतली होती ती पूर्ण केली आहे. कोल्हापूरच्या जनतेने आपला स्वाभिमान राखला आहे. महाविकास आघाडीतल्या सर्व नेत्यांनी मला सहकार्य केले. हा विजय माझ्या कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. चंद्रकांत जाधव यांनी जे पेरले तेच उगवले. मताधिक्य मिळणार याची अपेक्षा होती कारण जनता आमच्यासोबत होती,” अशी प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी दिली.