नांदेड : तेलंगणातील निजामाबाद जिल्ह्यातील इंदलवाई मंडलामधील चंद्रायनपल्ली महामार्ग ४४ वर रविवारी मोटार व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले असून यामध्ये कुंडलवाडी येथील दोन सख्ख्या भावांसह अन्य एकाचा समावेश आहे. हैदराबाद-नागपूर महामार्गावर मोटार भरधाव समोरून येणाऱ्या कंटेनरला धडकल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात कुंडलवाडी येथील गणेश हानमलू निरडी (वय २९), आदित्य हानमलू निरडी (वय २७), प्रकाश सायलू अंकलवार (वय २९) व निजामाबाद येथील साईनाथ भाळे हे चारजण जागीच ठार झाले आहेत. गणेश व आदित्य हे सख्खे भाऊ असून त्यांचा मोबाईल शॉपीचा व्यवसाय आहे. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी निजामाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले आहेत. या घटनेमुळे कुंडलवाडी शहरासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.