अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरनजीक धारवाडा येथील बिलदोरी नदीच्या पुलावरून ऑल्टो कार नदीत उलटल्याने एकाच कुटुंबातील चार जणांना जलसमाधी मिळाल्याची दुदैवी घटना गुरुवारी उघडकीस आली. संजय गोविंद आजनकर (४६), गजानन गोविंद आजनकर (४०), गायत्री गजानन आजनकर (३५) आणि श्रावणी गजानन आजनकर (७, सर्व रा.यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत. आजनकर कुटुंबीय मारुती ऑल्टो कारने वर्धमनेरी येथे नातेवाईकांकडील लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी यवतमाळ येथून निघाले होते. अंजनसिंगी ते कौंडण्यपूर मार्गावर धारवाडानजीक बिलदोरी नदीवरील पूल पार करताना कार नदीत उलटली.