सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कुडनूर गाव शनिवारी भीषण हत्याकांडाने हादरले. कुडनूर गावातील एकाच कुटुंबातील चार महिलांची शुक्रवारी रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही महिलांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार काल मध्यरात्री घडला. दरम्यान, या चौघींची हत्या जमिनीच्या वादातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील भारत कुंडलिक इरकर याने जमिनीच्या वादातून आपण चौघींची हत्या केल्याचे कबूल केले. त्याने आज सकाळी पोलीस ठाण्यात येऊन जन्मदात्या आईसह, पत्नी व दोन मुलींची हत्या केल्याचे सांगितले. आई सुशीला कुंडलिक इरकर (वय ६०), पत्नी सिंधुबाई भारत इरकर (वय ४०) आणि मुली रुपाली भारत इरकर (वय १९) व राणी भारत इरकर (वय १६) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुडनूर गावात एकच खळबळ उडाली आहे.