गडचिरोली नक्षलवादी हल्ल्याप्रकरणी जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस उपअक्षीधक शैलेश काळे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या जांभूरखेडा गावाजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. महाराष्ट्र दिनी घडवलेल्या या भूसुरुंग स्फोटात १५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यासाठी जबाबदार ठरवत शैलेश काळे यांचं निलंबन करण्यात आलं आहे. गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. लक्षवेधी सुचनेच्या चर्चेदरम्यान विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी पोलीस उपअक्षीक्षक शैलेश काळे यांनी सुरक्षेचे नियम न पाळल्याने हल्ला झाला असा आरोप करत त्यांच्या निलंबनाची मागणी केली. यावर बोलताना दीपक केसरकर यांनी या हल्ल्याचा सखोल चौकशी अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती दिली. तसंच दोन दिवसात निर्णय घेत दोषींवर कडक कारवाई केली जाईल असंही सांगितलं. गडचिरोली नक्षली हल्ला: …आणि उरला केवळ गाड्यांचा सांगाडा! पण विरोधी पक्ष नेत्यांनी शैलेश काळे यांच्या निलंबनाची मागणी जोर लावून धरली. यानंतर दीपक केसरकर यांनी शैलेश काळे यांच्या निलंबनाची घोषणा केली. दरम्यान या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना येत्या आठ दिवसात नोकरी मिळणार असल्याचंही त्यांनी यावेळी आश्वस्त केलं. धनंजय मुंडे यांनी ट्विटरवर प्रतिक्रिया व्यक्त करताना जवानांना त्यांचा हक्क मिळतोय हे विरोधी पक्षासाठी मोठं यश आहे असं म्हटलं आहे. बुधवारी सकाळी साडे अकरा वाजताच्या सुमारास जलद प्रतिसाद पथकातील जवान खासगी वाहनाने कुरखेडा येथून पुढे जात असताना कुरखेड्यापासून ६ किलोमीटर अंतरावरील जांभूरखेडा गावाजवळील पुलावर नक्षलींनी भूसुरुंग स्फोट घडवला. या हल्ल्यात १५ जवान शहीद झाले तर खासगी वाहनाचा चालकही ठार झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की, जवान प्रवास करत असलेल्या वाहनाच्या अक्षरक्ष: चिंधड्या उडाल्या होत्या.