सांगली : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करीत असताना आपण इतिहास गिरवणार की नवीन इतिहास घडवणार ? मला वाटते महात्मा गांधीजींना मारले ते बरे झाले, नाही तर सध्याची अवस्था पाहून गांधीजी रोज मेले असते अशी व्यथा गांधींजींचे पणतू तुषार गांधी यांनी व्यक्त केली.ते सांगली येथील शांतिनिकेतन विद्यापीठात क्रांतिअग्रणी डॉ.जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित व्याख्यानात बोलत होते. यावेळी आ. अरुण लाड, बाबुराव गुरव, ज्ञानेश महाराव, किरण लाड उपस्थित होते. हेही वाचा >>> “राज ठाकरे यांनीच दसरा मेळावा घ्यावा” मनसैनिकांची राज ठाकरेंना पत्राद्वारे विनंती गांधी म्हणाले, जर आजही पाणी पिण्यावरून सवर्ण मागासवर्गीयांवर आत्त्याचार करत आहेत आणि यावर पंतप्रधानांनी कसलीही टिपणी नाही केली, यातून कसली लोकशाही दिसून येते ही तर राजेशाही आहे. दिल्लीत एका युवतीवर बलात्कार झाला यानंतर मोठा उठाव झाला पण बिलकीस बानुवरील अत्याचाऱ्याच्या विरोधात कोणी का उभे राहिले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.केवळ मीच महात्मा गांधीजींचा वंशज नाही तर, जे महात्मा गांधींना राष्ट्रपिता मानतात ते ही त्यांच्या विचारांचे वंशज आहेत. जाती, धर्म, लिंग यामध्ये प्रत्येक गोष्टीत विभागणी केली जात आणि त्यानुसार त्यांच्याशी वागणूक केली जाते आहे. विचारांनी राष्ट्र बनते विचारांना गाढुन कसली राष्ट्रभक्ती साजरी करत आहेत असा सवाल त्यांनी उठवला. यावेळी श्री. महाराव म्हणाले, आपण सर्व हिंदूच आहोत पण त्याचा डंका वाजवायची गरज नाही. हिंदुत्वाच्या नावाखाली काहीजण चुकीचे हिंदूत्व मांडत आहेत. महात्मा गांधींनी या हिंदूत्वाचा निषेधच केला आहे.ज्या देशात माणसापेक्षा दगडाला जास्त किंमत असते तो देश कधीच महासत्ता बनू शकत नाही. शाहू, फुले आंबेडकर यांचे विचार पुढे नेण्यासाठी त्यांचा वारसा सक्षमपणे सांभाळला पाहिजे. यावेळी प्रसाद कुलकर्णी, ॲड. सुभाष पाटील, भाई संपतराव पवार, कॉम्रेड उमेश देशमुख, व्ही वाय पाटील, धनाजी गुरव, रमेश सहस्त्रबुद्धे, स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने यांच्यासह कवठेमहांकाळ, तासगाव, जत, खानापूर, वाळवा, कडेगाव येथून विद्रोही संस्कृती चळवळीचे कार्यकर्ते, राजश्री छत्रपती शाहू विचारमंच, किसान सभा, बळीराजा पार्टी यांचेसह सर्व डाव्या आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.