महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं २८ जानेवारीला विमान अपघातात निधन झालं. अजित पवार जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी बारामतीला विमानाने चालले होते. त्यांचं विमान बारामतीत उतरण्यापूर्वीच क्रॅश लँडिंग झालं आणि त्यात अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. २९ जानेवारीला अजित पवार यांच्या पार्थिवावर बारामतीत विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. संपूर्ण राज्याने अजित पवारांना साश्रू नयनांनी अजित पवारांना निरोप दिला. दरम्यान नृत्यांगना गौतमी पाटीलने आता एका मुलाखतीत अजित पवारांच्या अपघाती निधनाबाबत प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवारांविषयी गौतमी पाटील काय म्हणाली?

अजित पवारांच्या मृत्यूची बातमी मला आईने सांगितली. मला प्रचंड धक्का बसला. मी आईला म्हटलं तू हे काय बोलते आहेस? विश्वासच बसत नाही अजूनही की अजितदादा नाहीत. मी अजितदादांना कधीच भेटले नाही, पण दादांनी मला कायम सपोर्टच केला. माझ्याबाबत प्रश्न विचारला गेल्यावर दादांनी ज्या प्रकारे उत्तरं दिली ते माझ्यासाठी खूप होतं. दादा महाराष्ट्राचे लाडके नेते होते. जे घडलं ते खूप वाईट झालं. दादांचा कलाकारांना पाठिंबा कायम असायचा. अजितदादांकडे कुठलंही काम घेऊन गेलं तर ते होणारच याची खात्री असायची, आम्ही भेटलो नाही. पण माझ्याबाबतीत दोन शब्द जरी बोलले असतील तेच माझ्यासाठी खूप आहे. महाराष्ट्र दादांना कधीही विसरणार नाही. ते महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि कायम लाडके नेतेच राहतील.

वडील कधी भेटायला आलेच नाहीत, गौतमीने बोलून दाखवली खंत

गौतमी पाटीलने अभिजात मराठी या ओटीटी चॅनलला मुलाखत दिली या मुलाखतीत तिने वडिलांची साथ कधीही मिळाली नाही याचीही खंत बोलून दाखवली. गौतमी म्हणाली, मी शाळेत होते त्यावेळी प्रत्येकवेळी वाटायचं की माझ्या मैत्रिणींचे वडील येतात तर मग माझे वडील का येत नाहीत? आई उत्तर द्यायची नाही. आई कसंतरी टाळून वेळ मारुन न्यायची. मी सारखे प्रश्न विचारुन आईला त्रास दिला होता. लहानपणी काही कळत नाही. पण वडिलांची साथ मला मिळाली नाही. माझ्या आईने माझा विचार केला. वडील कधी भेटायला आलेच नाहीत. मला कायम वाटायचं की वडिलांना वाटत नसेल का? की आपल्या मुलीला भेटावं. वडिलांना वाटतं ना की मुलीला भेटावं त्यांना विचार आला नसेल का असा विचार मी करते हे बोलताना गौतमीला अश्रू अनावर झाले होते. माझे वडील वारले, त्याआधी मी त्यांना एकदा भेटले होते तो प्रसंगही माझ्यासाठी खूप अवघड होता असं गौतमीने या मुलाखतीत सांगितलं.