Girish Mahajan On Badlapur Protest : बदलापूरमधील एका शाळेत १३ ऑगस्ट रोजी दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांनी दिरंगाई केल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आला. या घटनेनंतर संतापलेल्या नागरिकांनी आज (२० ऑगस्ट) संबधित शाळेची तोडफोड करत आंदोलन केलं. तसेच बदलापूर रेल्वे स्थानकामध्येही रेल्वे रोको आंदोलन केलं. जवळपास गेल्या ९ तासापांसून हे आंदोलन सुरु होतं. आंदोलकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली. जोपर्यंत आरोपीला कठोर शिक्षा देण्यात येत नाही तोपर्यंत आम्ही रेल्वे ट्रॅकवरून हटणार नाहीत, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती.

यानंतर मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत शांतता राखण्याचं आवाहन करत आंदोलन थांबवण्याची विनंती केली होती. मात्र, आंदोलकर्ते त्यांच्या भूमिकेवर ठाम होते. यानंतर अखेर पोलीसांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जमलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करत आंदोलकांना हटवलं. त्यामुळे तब्बल दहा तासांनी रेल्वे मार्ग मोकळा झाला. यानंतर गिरीश महाजन यांनी माध्यमांशी संवाद साधत विरोधकांवर गंभीर आरोप केला आहे. “आंदोलनाच्या आडून विरोधक राजकारण करत असून काही ठरावीक लोकांना या ठिकाणी सोडून दिलं”, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.

हेही वाचा : “…तर राज्यात पुन्हा अशी घटना घडणार नाही”, बदलापूर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारला सल्ला

गिरीश महाजन काय म्हणाले?

“आंदोलक जर इथंच बसले तर बाकीचे लाखो लोक कुठे जणार? आता रेल्वेही लवकरच सुरु होईल. मात्र, विरोधकांनी राजकीय फायदा म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बाहीण योजनेवरून त्यांच्या पोटात मोठा गोळा उठला आहे. त्याचा आणि या घटनेचा काहीही संबंध नाही. मात्र, जाणीवपूर्वक पोस्टर्स छापून या ठिकाणी आणले होते. ते पोस्टर्स या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. विरोधकांनी एवढी खालची पातळी गाठू नये. मला तर विरोधकांची कमाल वाटते. ही घटना कुठली आहे? त्या घटनेची तीव्रता किती आहे? हे काहीही पाहत नाहीत. फक्त राजकीय फायदा कसा होईल? यासाठी ठरावीक लोकांना या ठिकाणी सोडून दिलं. ठरावीक लोकांना या ठिकाणी सोडून दिलं असं मी म्हणेन. कारण या आंदोलनामध्ये स्थानिक लोक किती? आणि बाहेरील लोक किती हे देखील सिद्ध होईल. हे सर्व कॅमेऱ्यामध्ये आले आहे”, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महाजन पुढे म्हणाले की, “आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, अशा पद्धतीने काही ठरावीक लोकांना सोडून द्यायचं आणि त्यांना बोलायला लावायचं. मुद्दाम सरकारच्या विरोधात पोस्टर्स आणि बॅनर्स लावायचे. मला वाटतं ही घटना आणि त्या घटनेची तीव्रता हे पाहून आपण राजकारणापासून दूर राहू, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. त्यामुळे याचा विचार त्या पद्धतीने झाला पाहिजे. या घटनेचं कुणीही राजकारण करु नये, अशी माझी विनंती आहे. जे लोक बॅनर्स घेऊन आले होते? ते कोण होते? ते लोक कोणाच्या संबंधित होते? यामध्ये राजकारण केलं जात आहे”, असा आरोप गिरीश महाजन यांनी केला.