जालना : मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात सात वर्षांची मुलगी संध्या पाटोळेचा मृत्यू झाला. जालना शहरात गांधीनगर भागातील ही घटना आहे. दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतील स्वच्छता निरीक्षक राधेश्याम लोखंडे यांना महापालिका प्रशासनाने निलंबित केले आहे.

संध्या पाटोळे ही मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास आपल्या घराबाहेरील अंगणात खेळत असताना काही मोकाट कुत्रे तेथे आले आणि त्यांनी तिच्यावर हल्ला करून लचके तोडले. तिला फरपटत नेले. या भागातील काही रिक्षाचालकांनी कुत्र्यांना हुसकावून लावले. मात्र, या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीला रुग्णालयात हलविण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

या मुलीचे चुलते राम पाटोळे म्हणाले, ‘ गांधीनगर झोपडपट्टी भागात आम्ही राहतो. मात्र, या भागात १५ दिवस झाले, एकदाही घंटागाडी आलेली नाही. त्यामुळे कचरा साठतो. या कचऱ्याभोवती कुत्रे आणि डुकरांचे राज्य आहे. सोमवारी सकाळी मुलगी खेळण्यासाठी बाहेर गेली असता ही घटना घडली.’

घटनेनंतर स्थानिक आमदार अर्जुन खोतकर यांनी मृत मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्तांशी संपर्क साधून शहरातील मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण आणि बंदोबस्त करण्याची सूचना केली. शिवसेनेचे (उद्धव ठाकरे) जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी याप्रकरणी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली असून, यासाठी महापालिकेचे प्रशासन जबाबदार असल्याचे म्हटले आहे.

महिनाभरापूर्वी जालना शहरातील संजयनगर भागात मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात एक आठ वर्षांचा मुलगा जखमी होऊन त्याच्या जखमांवर शंभरपेक्षा अधिक टाके घालावे लागले होते. त्या वेळी आपल्या पक्षाने महापालिकेसमोर आंदोलन करून मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची मागणी केली होती. परंतु संवेदना हरवून बसलेल्या महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेतली नाही, असे अंबेकर म्हणाले.

अजित कोठारी म्हणाले, ‘दर वर्षी महापालिका कुत्र्यांच्या निर्बीजीकरणावर लाखो रुपये खर्च करते. हा खर्च कागदोपत्री आहे का, याची शंका येते. मोकाट कुत्र्यांची नसबंदी आणि त्यावर झालेल्या खर्चाची माहिती महापालिकेकडून दिली जात नाही. जालना शहरात बाहेरच्या जिल्ह्यातूनही मोकाट कुत्री आणून सोडली जातात काय, याचीही माहिती महापालिकेने घेतली पाहिजे. गांधीनगर भागात मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात झालेल्या मुलीच्या मृत्यूस महापालिका जबाबदार आहे.

या संदर्भात जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही कोठारी यांनी केली. महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्याशी या अनुषंगाने संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘आपण रुजू झाल्यानंतर कुत्र्याचे निर्बिजीकरण करण्याचे काम हाती घेतले होते. मात्र, हे काम करणारा कंत्राटदार पुढे काम सोडून पळून गेला. आता पुन्हा २५ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. शहरात साधारणत: पाच हजारांहून अधिक कुत्रे मोकाट फिरत आहेत. त्यातील केवळ ५०० कुत्र्यांचे निर्बिजीकरण झाले आहे. ही घटना दुर्दैवी आहे. यावर आम्ही आता तातडीने पावले उचलत आहोत.’