नोबेल पारितोषिक विजेत्यांची नावे आपल्याला कळते, मात्र तामीळ, मल्याळम सारख्या प्रादेशिक भाषांमध्ये लेखन करणाऱ्या साहित्यिकांविषयी माहिती होत नाही ही खेदाची बाब आहे. भारतीय साहित्यावर जागतिकीकरणाचा मोठा प्रभाव पडत आहे. यामुळे भाषा आणि संस्कृतीच्या नाते संबंधात दरी निर्माण झाल्याची खंत ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरूण साधू यांनी व्यक्त केली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्यावतीने देण्यात येणारा सहावा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराने शुक्रवारी ज्येष्ठ नागा साहित्यिक डॉ. तेमसुला आओ यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून साधू बोलत होते.मुक्त विद्यापीठात झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. माणिकराव साळुंखे तर प्रमुख पाहुणे म्हणून इन्फ्लीब्नेटचे संचालक डॉ. जगदीश अरोरा, कुसुमाग्रज अध्यासनच्या समन्वय कमाधवी धारणर,वित्त अधिकारी पंडित गवळी उपस्थित होते. एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. एका भाषेतून दुसऱ्या भाषेतील आदानप्रदान संपले असून सर्व भाषांमध्ये जवळचे नाते निर्माण व्हायला हवे असे साधू यांनी नमूद केले. यावेळी आओ यांच्या काही नावाजलेल्या कविताही त्यांनी म्हटल्या. आओ यांच्या साहित्यावर प्रकाश टाकला. त्यांच्या साहित्याने अनेक आयाम दिल्याचे साधू यांनी सांगितले. डॉ. आओ यांनी भाषा हे या सर्वाना परस्परांशी जोडणारे माध्यम असल्याचे सांगितले.