संजय राऊत 

गोंदिया

‘धानाचे कोठार’ आणि ‘तलावांचा जिल्हा’ म्हणून ओळखला जाणारा गोंदिया जिल्हा राज्याच्या एका टोकाला आहे. या ठिकाणी धानाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असले तरी, शेतमालाला भाव नसल्याने शेतकरी गरीबच राहिला आहे. त्यातच सिंचनाचे अनेक प्रकल्प रखडल्याचा मोठा फटका जिल्ह्याच्या विकासाला बसला आहे.

जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात धान उत्पादन होते. त्यामुळे येथे अनेक राइस मिल सुरू झाल्या. मात्र उत्पादकांना त्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या संपन्नतेसाठी याचा विशेष उपयोग होत नाही. धानाची शेती हेच जिल्ह्याचे उपजीविकेचे प्रमुख साधन असले तरी गोंदिया जिल्ह्यातील सिंचनाखालील जमीन ३९,५०४ हेक्टर आहे. धानाच्या जोडीला आता ऊस, मका व बागायती पिकांनीसुद्धा घेतलेली आहे. इटियाडोह बांध, नवेगावबांध, गोसेखुर्द कालवा, धापेवाडा उपसा सिंचन योजनेचा जिल्ह्याला फायदा झाला असला तरी काटी उपसा सिंचन योजना व धापेवाडा उपसा योजना अनेक वर्षांपासून रखडलेल्या आहेत.

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय नेते व माजी नागरी विमान वाहतूकमंत्री प्रफुल पटेल यांनी यूपीएच्या कार्यकाळात जिल्ह्यात राजीव गांधी उड्डाण अ‍ॅकेडमी व बिर्सी विमानतळ सुरू झाले. त्यामुळे जिल्हा हवाई नकाशावर आला. मध्यंतरी येथून हवाई वाहतूकसुद्धा सुरू झालेली होती. त्यामुळे जिल्ह्यात मोठे उद्योग सुरू होण्याची व त्यापासून रोजगार संधी उपलब्ध होण्याची एक आशा निर्माण झाली होती. मात्र चार महिन्यांतच हवाई वाहतूक बंद झाली.

जिल्ह्यात २६८ प्राथमिक आरोग्य केंद्रे, ८४ रुग्णालये आहेत. शहरात एक स्त्री रुग्णालय, एक वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयांवर जिल्ह्याच्या आरोग्याचा भार आहे. वैद्यकीय महाविद्यालयात तज्ज्ञ डॉक्टरांच्या जागा रिक्त आहेत. या तुलनेत खासगी वैद्यकीय रुग्णालये असली तरी तेथील खर्च न झेपणारा असतो. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील रुग्णसेवा अधिक उत्तम आणि दर्जेदार करण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात १ हजार ६५२ शाळा असल्या तरी विद्यार्थ्यांची गळती रोखण्यात प्रशासनाला यश आले नाही. रोजगाराच्या शोधात कुटुंबांचे स्थलांतर हे यामागचे प्रमुख कारण मानले जाते. ६२ कनिष्ठ महाविद्यालये असली तरी विद्यार्थ्यांना बारावीनंतरच्या चांगल्या शिक्षणासाठी इतरत्र धाव घ्यावी लागते. येथील एकमात्र अभियांत्रिकी महाविद्यालय राजकीय वादातून बंद झाले. त्यामुळे आता अभियांत्रिकीकरितासुद्धा विद्यार्थ्यांना इतर जिल्ह्यात जावे लागते.

पर्यटन विकासाला संधी

जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यानासह अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. १३३.७८ चौ.कि.मी. क्षेत्रफळात पसरलेले हे स्थळ निसर्ग संवर्धनाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे मानले जाते. येथे पक्ष्यांच्या २०९ प्रजाती, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या ९ आणि २६ सस्तन प्राण्यांच्या प्रजाती आहेत. येथे पक्षी निरीक्षणासाठी देश-विदेशातील पर्यटक दरवर्षी येतात. त्याशिवाय भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्ह्याच्या मध्यात असलेले नागझिरा अभयारण्य, कचारगढ (जुन्या नैसर्गिक गुहा), हाजरा फॉल, पदमपूर (संस्कृत लेखक भवभूतीचे जन्मस्थान), चूलबंध धरण, तिबेटी कॅम्प प्रतापगढ आदी स्थळे पर्यटकांना आकर्षित करणारी आहेत. पर्यटकांसाठी सोयीसुविधा येथे निर्माण केल्यास येथे रोजगार निर्मितीही होऊ शकते.

खनिजाचा विपुल साठा

गोंदिया जिल्ह्यात मुबलक प्रमाणात खनिजे आहेत. जिल्ह्यात उच्च तसेच हलक्या प्रतीचे मँगनीज आढळून येते. याशिवाय विटा, कवेलूसाठी आवश्यक असणारी चांगल्या प्रतीची माती जिल्ह्यात आहे. २०२१-२२ मध्ये ‘क्वाट्र्ज’,‘क्वॉर्टाझाइट्स सॅण्ड’चे २६ हजार ८४५ मे. टन आणि आयर्न ओरचे १८,६०७ मे.टन उत्खनन करण्यात आले होते व त्यापासून शासनाला ३५.५९ कोटींचा महसूल प्राप्त झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तेंदूपत्ता, विडी उद्योग

जिल्ह्यात तेंदूपाने व लाख गोळा करणे हा एक पूरक उद्योग असून यातून रोजगार उपलब्ध होतो. जिल्ह्यात दुसरा महत्त्वाचा उद्योग विडी तयार करणे हा आहे. त्याचे कारखाने आहेत. धानाचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होत असल्यामुळे येथे राइस मिल उद्योगही मोठय़ा प्रमाणात आहेत.