सोलापूर : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रतिसाद समाधानकारक आहे. राहुल गांधी यांनी कष्ट घेऊन काढलेल्या या यात्रेचे स्वागत केले पाहिजे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी व्यक्त केले. सोमवारी कुर्डूवाडी येथे एका कार्यक्रमासाठी पवार आले होते.

हेही वाचा >>> सांगलीत भाजपकडून जुने हिशेब चुकते

देशातील राजकारणात यापूर्वी माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी देशव्यापी यात्रा काढली होती. आपण स्वत: जनतेच्या प्रश्नावर नागपूरला यात्रा काढली होती. या दोन्ही यात्रांचे दाखले देत पवार यांनी राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेविषयी भाष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या विरोधात सर्व विरोधी पक्ष एकत्र आले तर त्याचे स्वागतच करायला हवे. मात्र अजून तरी देशात सर्व विरोधक भाजपच्या विरोधात झाडून एकत्र येण्याची परिस्थिती दिसत नाही, असेही मत त्यांनी व्यक्त केले. भाजपच्या एका नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कधीही पराभूत होऊ शकत नाहीत, असा दावा केला आहे. त्यावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार यांनी, याबद्दल भाष्य करायला आपण काही ज्योतिषी नाही. परंतु कोणाला निवडून द्यायचे आणि कोणाला पराभूत करायचे, हे मतदार जनताच ठरवते. जनतेला कोणीही गृहीत धरू नये, अशी टिप्पणी पवार यांनी केली.