अहिल्यानगर : कृषी विद्यापीठांनी हवामान बदलांना तोंड देणाऱ्या पिकांच्या जाती विकसीत कराव्यात, तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता, ड्रोन व डिजिटल तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेतकऱ्यांना योग्य वेळी आवश्यक माहिती द्यावी, कृषी प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन आणि कृषी मूल्यसाखळी विकसित करणेही महत्त्वाचे आहे, अशी अपेक्षा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज, मंगळवारी राहुरीत बोलताना व्यक्त केली. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ३८ व्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, कृषी वैज्ञानिक निवड मंडळाचे अध्यक्ष डॉ. संजयकुमार, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. नितीन दानवले आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, वाढता उत्पादन खर्च, मर्यादित बाजारपेठ प्रवेश आणि अपुरी भावनिश्चिती प्रणाली यामुळे कृषी क्षेत्र अधिक अडचणीत येत असताना भारतीय शेतीला शाश्वत, आर्थिक लाभाची आणि भविष्यासाठी सक्षम व्यवसायात रूपांतरित करण्यासाठी कृषी विद्यापीठांची भूमिका महत्त्वाची आहे. अधिक उत्पन्न देणारी आणि पोषणमूल्यांनी भरलेली पिके विकसित करणे हे कुपोषणाला थोपवण्यासाठी, अन्न व पोषण सुरक्षा देण्यासाठी अत्यावश्यक आहे. नवोपक्रम, शिक्षण आणि शाश्वत पद्धतींच्या माध्यमातून भारतीय शेतीच्या अडचणींवर मात करून यशस्वी होऊ शकते. कृषी पदवीधरांनी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्याने या आव्हानांना सामोरे जाऊन आधुनिक कृषी पद्धती विकसित करावी.
कृषीमंत्री कोकाटे म्हणाले, वातावरणतील बदलावर मात करण्यासाठी कृषीक्षेत्रात बदल करून नवे तंत्रज्ञान स्वीकारावे लागेल. कमी खर्चात नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने अधिक उत्पादन घेण्याचे प्रयत्न करावे लागतील. नव्या कल्पना, नैसर्गिक शेती, कृषी यांत्रिकीकरण, कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती पद्धतीत बदल घडवून आणावे लागतील. फलोत्पादन व निर्यातीवर भर देणेही गरजेचे आहे. कृषी पदवीधरांनी ज्ञानाचा उपयोग कृषी क्षेत्राच्या उन्नतीसाठी करावा. डॉ. संजय कुमार म्हणाले, कृषी उद्योजकतेची व कृषी पर्यटनाला चालना देण्याची गरज आहे. कृषी स्नातकांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी निर्भयपणे नावीन्याचा पर्याय निवडावा. कार्यक्षम मूल्यसाखळी तयार करावी, कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमॅन्युफॅक्चरिंग हब तयार करावे. कृषी उत्पादनाच्या ब्रॅण्डिंगला प्रोत्साहित करावे. बाजारपेठेत प्रवेशासाठी विविध आउटलेट किंवा कृषी उत्पादनांचे मॉल तयार करावे.
राज्यपाल विद्यापीठात मुक्काम करणार कृषी क्षेत्र आणि कृषी विद्यापीठाच्या गरजा लक्षात घेण्यासाठी आपण तीन दिवस विद्यापीठात मुक्काम करणार असल्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी यावेळी बोलताना सांगितले.
तंत्रज्ञानाच्या १८६६ शिफारसी कुलगुरू डॉ. गडाख वार्षिक अहवाल सादर करताना म्हणाले, विद्यापीठाने शेतकऱ्यांना उपयुक्त असलेल्या १ हजार ८६६ तंत्रज्ञान शिफारशी, विविध पिकांच्या ३११ वाणांची निर्मिती आणि ५१ कृषी अवजारे व यंत्रांची निर्मिती केली. राहुरी कृषी विद्यापीठाने विकसीत केलेल्या ऊस, डाळिंब, हरभरा, रब्बी ज्वारी, कांदा, भात, लिंबू व बाजरी या प्रमुख ८ पिकांच्या वाणामुळे आजपर्यंत राज्याच्या अर्थव्यवस्थेत ढोबळमानाने २ लक्ष ४० हजार १८८ कोटी व निव्वळ ३२ हजार २० कोटी रु. महसुली उत्पन्नाची भर पडली आहे.