रत्नागिरी : वन विभागाने परदेशातील ॲडव्हेन्चर पार्कप्रमाणे आरेवारे येथे पर्यटनावर आधारित सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करावा. त्यासाठी जिल्हा नियोजनमधून पाच कोटी निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिले आहेत.महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या विश्रामगृहात पालकमंत्री डॉ. सामंत यांनी  विविध बैठका घेतल्या. बैठकीला उपवन संरक्षक गिरिजा देसाई, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे तांत्रिक सल्लागार सुनील देशमुख, तहसिलदार राजाराम म्हात्रे, मुख्याधिकारी तुषार बाबर, गटविकास अधिकारी जे. पी. जाधव, प्रादेशिक अधिकारी वंदना खरमाळे, कार्यकारी अभियंता सचिन राक्षे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, वन पर्यटन, इको टुरिझम याबरोबरच वॉच टॉवर दुरुस्ती, वन भ्रमंती पोर्टल, आवश्यक असणाऱ्या बसेस, महिंद्रा जीप यासारख्या सुविधांवर वन विभागाने भर द्यावा. त्याचबरोबर जुवे जैतापूर येथे कांदळवन आधारित नियोजन करावे अशा सुचना सामंत यांनी दिल्या.

स्मार्ट सिटी बाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि रत्नागिरी नगरपरिषदेने तातडीने नियोजन करुन विकास कामांना सुरुवात करावी, असे सांगून पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, गटविकास अधिकारी यांची बैठक तहसिलदारांनी घ्यावी आणि मिऱ्या शिरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना मार्गी लावावी. या योजनेसाठी ज्या ज्या गावांतून अडचणी येत आहेत, त्याबाबत संबंधित गावांच्या सरपंचांबरोबर बैठक घेवून त्यांना त्याची माहिती द्यावी.कोस्टल महामार्गबाबतही पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. काळबादेवी ग्रामस्थांना विश्वासात घेऊन  त्यांच्या सूचनेनुसार काम करण्यास प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री म्हणाले. राष्ट्रीय महामार्ग १६६, महिला बचत गट, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा नियोजन समितीबाबत खर्च आढावा देखील पालकमंत्री डॉ. सामंत यांनी घेतला.

Story img Loader