राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भात केलेल्या वादग्रस्त विधानानंतर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. यावरून राज्याचे राजकीय वातावरण तापले असताना आज खासदार उदयनराजे भोसले यांनी रायगडावरील कार्यक्रमात बोलताना राज्यपालांवर जोरदार टीका केली. तसेच राज्यपालांविरोधात मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, उदयनराजेंच्या या भूमिकेबाबत बोलताना शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी, उदयनराजेंनी आंदोलन करू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे. ते जळगावमध्ये माध्यमांशी बोलत होते. हेही वाचा - “शिवरायांच्या अपमानावर गप्प बसणारे राज्यपालांइतकेच दोषी”, उदयनराजेंच्या विधानावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया; म्हणाले… काय म्हणाले गुलाबराव पाटील? “ उदयनराजेंनी दिलेल्या सुचना सर्वांनी अंमलात आणल्या पाहिजे. ते राजे आहेत. मात्र, मी त्यांना केवळ विनंती करू शकतो की, त्यांनी हे आंदोनल करू नये. आपण सर्व मिळून अशी विधानं रोखण्यासाठी शासनाकडे हा मुद्दा मांडून याबाबत काही कायदा करता येईल का? याचा विचार करण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. हेही वाचा - ‘कर्नाटक भवन’च्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचे शिंदे सरकारवर टीकास्र; म्हणाले, “बेळगावच्या प्रश्नावर मुख्यमंत्री…” दरम्यान, भाजपाकडून राज्यपालांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे, याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “हा विषय माझ्या अखत्यारित नाही. मात्र, मी एवढंच सांगेन राज्यपाल असतो किंवा कोणीही असो, शिवाजी महाराजांबद्दल बोलताना सर्वांनी सांभाळून बोललं पाहिजे. ते आपले दैवत आहेत. शिवरायांबाबत बोलताना प्रत्येकाने संयमाने, आदरपूर्वक बोललं पाहिजे. शिवाजी महाराज होते म्हणून आपण आहोत, याचे भान कोणीही सोडू नये. बाहेरच्या माणसाने इकडे येऊन शिवाजी महाराजांबाबत बोलायचे असेल, तर त्यांनी आधी शिवाजी महाराजांचे चरित्र वाचावे, अभ्यास करावा, मगच बोलावं”, असेही ते म्हणाले.