नाणार प्रकल्प हा शिवसेनेचा पैसे कमवण्याचा व्यवसाय आहे अशी टीका नारायण राणेंनी केली होती. याबाबत शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना प्रतिक्रिया विचारली असता “नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत, त्यांना काही कामधंदा उरलेला नाही. ते घडीत काही बोलतात, नंतर काहीतरी बोलतात. बोललल्याशिवाय त्यांच्याकडे कुणी लक्ष देत नाही म्हणून ते तोच प्रयत्न करतात. त्यांना त्यांच्या पक्षात म्हणजेच भाजपातही कुणी काम देत नाही. त्यामुळे ते असं काही तरी बोलतात.  ते मुख्यमंत्री असताना त्यांनी कोकणासाठी किती प्रकल्प आणले?” असाही प्रश्न गुलाबराव पाटील यांनी विचारला आहे.

नारायण राणे जेव्हा शिवसेनेत होते तेव्हा शिवसेनेने त्यांना खूप काही दिलं. शिवसेनेत असताना ते मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले होते. मात्र तरीही त्यांनी कोकणासाठी काहीही केलं नाही. त्यामुळे कोकणासाठी कुणी काय केले? यावर त्यांनी बोलूच नये. नारायण राणे प्रसिद्धी मिळवण्यासाठी अशी वक्तव्यं करत असतात अशीही टीका गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

काही दिवसांपूर्वीच सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन पत्रकार परिषद घेत ठाकरे सरकारवर नारायण राणेंनी हल्लाबोल केला होता. उद्धव ठाकरे एका मंत्र्याला वाचवू पाहात आहेत असा आरोप त्यांनी केला होता. याबाबत शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहणं महत्त्वाचं होतं. याच वेळी त्यांनी नाणार हा शिवसेनेचा पैसा कमवण्याचा व्यवसाय असल्याचंही वक्तव्य केलं होतं. नारायण राणेंच्या याच वक्तव्याबाबत प्रश्न विचारला असता गुलाबराव पाटील यांन नारायण राणेंना सुशिक्षित बेरोजगार राजकारणी म्हटलं आहे. तसंच त्यांना आता काहीही कामधंदा उरला नसल्याचंही वक्तव्य केलं आहे.