राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिकांवर निशाणा साधलाय. “या माणसाने तीन भूमिका बदलल्या, चौथी भूमिका बदलवणंही सोपं आहे,” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरेंना टोला लगावला. तसेच पक्ष स्थापनेआधी मराठी म्हणून उत्तर प्रदेशच्या कानफटीत मारायची, नंतर भोंगा आणि आता झाला ठेंगा असं म्हणत गुलाबराव पाटलांनी टीका केली. ते शनिवारी (७ मे) जळगावमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

गुलाबराव पाटील म्हणाले, “या माणसाने तीन भूमिका बदलल्या, चौथी भूमिका बदलवणं काय सोपं आहे. यांनी पक्ष स्थापन केला तेव्हा ‘सबको साथ लेके चलेंगे’ असं म्हटलं. पक्ष स्थापन करण्याआधी मराठी म्हणून उत्तर प्रदेशच्या कानफटीत मारली.”

“आधी भोंगा आणि आता झाला ठेंगा अशी मनसेची अवस्था”

“पक्ष स्थापन करताना वेगळा झेंडा लावायचा, तो झेंडा नंतर बदलवला, नंतर भूमिका बदलवली. मोदींची प्रशंसा केली, नंतर लाव रे तो व्हिडीओ आणि नंतर पुन्हा मोदीजी. यानंतर तो भोंगा आणि आता झाला ठेंगा अशी मनसेची अवस्था आहे,” असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी मनसेला खोचक टोला लगावला.

हेही वाचा : “शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही…”, गुलाबराव पाटलांची राज ठाकरेंवर जोरदार टीका

दरम्यान राज ठाकरेंचा हिंदुजननायक उल्लेख करण्यासंबंधी विचारण्यात आलं असता गुलाबराव पाटील म्हणाले की, “हिंदू जननायक कुणाला म्हटलं म्हणजे तो काय हिंदू जननायक होतो काय? राज ठाकरे यांचा जन्म शिवसेनेत झाला. शिवसेना राहिली नसती तर हे कुठे राहिले असते.”

“बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने ते युवासेनेचे अध्यक्ष झाले होते. आता ठीक आहे त्यांनी पक्ष बदलला त्याबद्दल आमचं काही म्हणणं नाही. पण ज्या शिवसेनेच्या तुकड्यांवर तुम्ही मोठे झालात त्या शिवसेनेवर बोलायचा तुम्हाला अधिकार नाही,” अशी टीकाही गुलाबराव पाटलांनी केली होती.