खंडाळा तालुक्यात बँक खात्याअभावी तीन हजार अतिवृष्टी व गारपीटग्रस्त शेतकरी नुकसान भरपाई अनुदानापासून वंचित राहिले असून लाभार्थींचे बँकखाते क्रमांक मिळविण्यासाठी तहसील कार्यालयाद्वारा प्रयत्न सुरू असल्याची माहिती तहसीलदार शिवाजी तळपे यांनी दिली.  
खंडाळा तालुक्यात २०१२-१३ मध्ये दुष्काळामुळे कृषी व फळपिकांचे नुकसान झाले होते. यामध्ये २३४ गावांची पन्नास पैशापेक्षा कमी पसेवारी शासनामार्फत करण्यात आली होती.यामध्ये शिरवळ व लोणंद मंडलातील ७०९३ शेतक-यांकरता १ कोटी ८२ लाख ३६ हजार नुकसान अनुदान प्राप्त झाले होते. यामध्ये ४३८८ शेतकऱ्यांच्या खात्यावर १ कोटी २७ लाख ७० हजार ९४ रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले.अद्यापही २७०५ शेतक-यांचे ५४ लाख ६५ हजार ९०६ रुपयाचे अनुदान शिल्लक आहे.
सप्टेंबर २०१३मध्ये अतिवृष्टीमुळे फळपिकांचे व शेतीचे २२ गावातील १३ लाख ६५ हजाराचे अनुदान प्राप्त झाले. यापैकी १३५७ शेतक-यांच्या बँकखात्यावर ११लाख २२हजार २५० रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले आहे. तर २३८ शेतक-यांचे २ लाख ४२ हजार ७५० रुपयांचे नुकसान अनुदान शिल्लक आहे. सन २०१२-१३ मधील २७०५ शेतक-यांचे ५४ लाख ६५ हजार ९०६ व २०१३ मधील ३२८ शेतकऱ्यांचे अनुदान बंॅकखाते नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर वर्ग करणे बाकी आहे. या सर्वाचे खाते क्रमांक तातडीने मिळविण्यासाठी मंडलाधिकारी व तलाठय़ांना सूचना देण्यात आल्या आहेत. या सर्व लाभार्थी शेतक-यांचे बॅंकखाते क्रमांक मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती तहसीलदार शिवाजी तळपे व नायब तहसीलदार भोईटे यांनी दिली.