नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे (शिवसेना) उमेदवार हेमंत गोडसे यांनी मिळविलेला विजय नाशिककरांसाठी बिल्कूल अनपेक्षित नव्हता. केवळ त्यांना मिळालेले एक लाख ८७ हजार ३३६ मताधिक्य सर्वासाठीच अनपेक्षित ठरले. नाशिकमधून राष्ट्रवादीकडून सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांची उमेदवारी जाहीर झाल्यावर त्यांचा सहज विजय गृहीत धरण्यात येत होता. परंतु प्रचाराचा एकेक दिवस पुढे सरकत गेला. आणि परिस्थिती बदलत गेली. भुजबळांना त्याची जाणीव झाल्यावर त्यांनी काँग्रेसला चुचकारण्यासह समाजातील विविध घटकांच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यास सुरूवात केली. मनसे आणि महायुतीच्या उमेदवारात मतविभागणी होऊन भुजबळांचा विजय सुकर होईल, असा राष्ट्रवादीचा अंदाज होता. परंतु मनसेचे उमेदवार डॉ. प्रदीप पवार यांचा कोणताही प्रभाव पडेनासा झाल्याने भुजबळ विरोधातील मते गोडसे यांच्यामागे एकवटू लागली. गोडसे यांनी ग्रामीण भागासह शहरी भागात केलेले प्रचाराचे सूक्ष्म नियोजन, वासुदेवचा वापर, पथनाटय़े अशा प्रकारे त्यांनी प्रचार केला. पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या घरोघरी जाऊन त्यांचे केलेले सांत्वन, आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाबद्दल गावागावातून केलेला प्रचार, मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात पसरलेले नातलगांचे जाळे, काँग्रेससह राष्ट्रवादी व मनसेतही असलेले संबंध, हे सर्व गोडसे यांना ग्रामीण भागात कामास आले.