तळी आणि वन समृद्ध म्हणून ओळख असलेल्या भंडारा जिल्ह्य़ात पक्ष्यांच्या विविध प्रजातींचीही संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. जिल्ह्य़ात अनेक भागात बगळ्यांचे अस्तित्व असून बगळ्यांचे थवे पर्यावरणाचे संतुलन कायम ठेवण्याचे नैसर्गिक काम अव्याहतपणे बजावतात. बगळ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने शिकाऱ्यांच्या टोळ्यांनीही आपले लक्ष्य त्याकडे वळविले असून रोज किमान १५-२० बगळ्यांची शिकार केली जात असल्याने जिल्ह्य़ातील बगळे झपाटय़ाने कायम नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. काही मुरलेले शिकारी तर काहीवेळा हौशी शिकारी मांसासाठी बगळ्यांना ठार करीत असून त्याविरुद्ध आता पर्यावरणवादी जागरूक झाले आहेत. ग्रीन हेरिटेज या संस्थेने बगळ्यांच्या शिकारीविरुद्ध आवाज उठविला असून अशा शिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.