राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनजंय मुंडे यांनी रंगपंचमीच्या शुभेच्छा देताना शिवसेना आणि भाजपावर निशाना साधला आहे. वेळोवेळी रंग बदलून सर्वांनाच चकीत करणाऱ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे. नैसर्गिक रंगांचा वापर करुया, पर्यावरण पूरक धूलिवंदनचा आनंद लुटूया असे आवाहनही मुंडे यांनी ट्विटर केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून प्रत्येक पक्षाने प्रचाराचा नाराळ फोडला आहे.

धनंजय मुंडे यांनी दोन ट्विट करत मोदींसह शिवसेना आणि भाजपावर खोचक टीका केली आहे. बुरा ना मानो होली है…असे म्हणत मुंडे यांनी युतीवर टिकास्त्र सोडले आहे. कभी तू फकीर लगता है, कभी आवारा लगता है, कभी तू चायवाला लगता है, कभी चोर चौकीदार लगता है असे ट्विट करत मुंडे यांनी मोदीवर निशाना साधला आहे. तर दुसऱ्या एका ट्विटमध्ये मुंडे यांनी शिवसेनेवर निशाना साधला आहे. यामध्ये शिवसेना नेत्यांच्या राजीनामा देण्यावरून मुंडे यांनी खोचक टीका केली आहे.

 महाराष्ट्राच्या जनतेचा कळवळा असल्याचा आव आणणाऱ्या, खुर्चीच्या मोहापायी राजीनामे खिशात घेऊन लोटांगण घालणाऱ्या, सत्तेला लाथ मारून-मारून ‘दमलेल्या बाबाला’, वाघ-शेळीचा खेळ खेळत वेळोवेळी आपले रंग बदलून सर्वांनाच चकीत करणाऱ्यांना रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा असे ट्विट मुंडे यांनी केले आहे.

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या आधिकृत ट्विटर खात्यावरूनही शिवसेना-भाजपाच्या युतीवर टीका केली आहे. पुरे झाले आता जुमलेबाजीचे रंग, जनता इथे बेहाल हे घोटाळ्यांत दंग असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. दुसऱ्या एका ट्विटमध्ये युतीतल्या दोन्ही पक्षांचे खरे रंग देशाने पाहिले आहेत. आता तुमच्या भूलथापांना महाराष्ट्र बळी पडणार नाही, हे मात्र नक्की असे म्हटले आहे.