धनंजय मुंडे यांच्या खोटेपणाचा आपल्याला कंटाळा आलाय, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी प्राचारादरम्यान पंकजा मुंडे यांच्यावर केलेल्या कथित आक्षेपार्ह टिपण्णीबाबत त्यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. गोपीनाथ गडावर दिवंगत गोपिनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, "पहिल्यांदा असं वाईट बोलायचं आणि त्यानंतर खोटंही बोलायचं हे चुकीचं आहे. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी हे वक्तव्य करावं आणि त्यावर त्यांच्या गँगनं टाळ्याही वाजवाव्यात यामुळं मला शॉकचं बसला. माझा रक्ताचा भाऊ असं बोलल्यामुळे मी अस्वस्थ झाले." "माझ्या जीवनातील सर्वात वाईट प्रचार असणारी आणि शॉक देणारी ही निवडणूकीत ठरली आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर अनेक जणांनी आपली भेट घेतली यावेळी लोकांच्या मनातही मला धनंजय मुंडेंबाबत तिरस्काराची भावना दिसून आली. लोकांसह मी देखील त्यांचा तिरस्कार करते. जग फार वाईट आहे, याचा बोध मी या निवडणुकीतून घेतला आहे. कदाचित मीच चुकीची आहे की काय असेही मला आता वाटायला लागले आहे, असा शब्दांत त्यांनी आपली उद्वीग्नता व्यक्त केली. हा आपल्याविरोधात कट असल्याचा आरोप करताना पत्रकार परिषेदत धनंजय मुंडेंना अश्रू अनावर झाल्याच्या घटनेवर पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केली. त्या म्हणाल्या, पत्रकार परिषद म्हणून चार माणसांना बोलवून बाईट द्यायचा याला काय म्हणायचं. सध्या अत्यंत विकृत राजकारण पहायला मिळतंय.