Ajit Pawar News : महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवा’त राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत पुन्हा एकदा खंत व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद पुन्हा एकदा उमटू लागले असून आता त्यांना मी माझे शब्द मागे घेतो, असं स्पष्टीकरणच द्यावं लागलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते.
“मलाही मुख्यमंत्री बनायचं आहे, पण योग जुळून येत नाही”, असं अजित पवारांनी एका कार्यक्रमात मिश्किलीत म्हटलं होतं. पण त्यांनी त्यांची ही खदखदच त्यांच्या वक्तव्यातून बाहेर काढली. त्यानंतर अनेकांनी यावर प्रतिक्रियाही दिल्या. त्यांच्या पक्षातील नेत्यांनी अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं, अशी अपेक्षाही पुन्हा बोलून दाखवली. याआधीही अजित पवारांनी अशी खंत बोलून दाखवली होती. पण यावेळी त्यांना त्यांचे शब्द मागे घ्यावे लागले.
मुख्यमंत्री पदाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, “मी गंमतीत म्हटलं होतं. मी तसं म्हटलं असेल तर माझे शब्द मागे घेतो. आज देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी १४५ पेक्षा जास्त आमदारांचं पाठबळ आहे. त्याआधी एकनाथ शिंदेंना होतं, त्याआधी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी पाठबळ होतं.”
अजित पवार सहावेळा उपमुख्यमंत्री
दरम्यान, अजित पवार आतापर्यंत सहावेळा उपमुख्यमंत्री राहिले आहेत. २०१० साली काँग्रेस सरकारच्या काळात पृथ्वीराज चव्हाण यांच्या सरकारकमध्ये ते उपमुख्यमंत्री होती. त्यानंतर, २०१२ मध्ये पुन्हा ते उपमुख्यमंत्री झाले. नोव्हेंबर २०१९ मध्ये भाजपाबरोबर गेलेल्या अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. मात्र, हे सरकार अल्पकाळच टिकलं. त्यानंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडीमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सरकारचा गाडा हाकला. तसंच, २०२२ मध्ये अजित पवारांनी बंड करत भाजपाला साथ दिली. त्यावेळीही ते एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाले. तर, आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महायुती सरकारने त्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री पदाची माळ घातली. त्यामुळे गेल्या सहा टर्ममध्ये उपमुख्यमंत्री राहिलेल्या अजित पवारांना आता मुख्यमंत्री पदाची आस लागलेली आहे. याबाबत त्यांनी याआधीही अनेकवेळा खंत व्यक्त केली आहे.