राज्यात भाजपा-शिंदे या नव्या सरकारवर आज शिक्कामोर्तब झाला आहे. कारण, या सरकारने आज विधीमंडळात विश्वासदर्शक ठराव जिंकला. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तोंडभरून कौतुक केले. यावरून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फडणवीसांवर निशाणा साधत, “शिंदेंमध्ये पात्रता होती तर मग तुमच्या काळात त्यांना एकच छोटसं खातं का दिलं होतं?” असा सवाल केला.

अजित पवार म्हणाले, “सत्ता येते सत्ता जाते, मी नेहमी राज्यात फिरत असताना सांगत असतो की ताम्रपट घेऊन कोणीच जन्मला आलेलं नाही. देवेंद्र फडणवीस मी तुमचं भाषण फार बारकाईने ऐकत होतो. मला एक गोष्ट कळत नव्हती की तुम्ही इतकं एकनाथ शिंदे यांचं समर्थन करत होतात. मग मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदे तुमच्या मंत्रीमंडळात जे होते, त्यावेळी फक्त रस्ते विकास महामंडळच खातं त्यांना का दिलं? ते एवढे कर्तृत्ववान होते.”

Maharashtra Floor Test Live : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महाभारत, रामायणाची पुनरावृत्ती होणार – भास्कर जाधव

तसेच, “नेता मोठा असला, की खाती जास्त असतात. चंद्रकांत पाटील तुम्हाला माहीत आहे. ज्याचं वजन असतं, तो नेता भारदस्त असतो. मुनगंटीवार खरंय की नाही? तुमच्याकडे वनखातं, वित्त, नियोजन, महसूल, पीडब्लूयडी, कृषी, सहकार होतं. किती तरी महत्त्वाची खाती होती. जर आजचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपण सांगताय, तेवेढे सर्वगुण संपन्न अशी त्यांची पात्रता होती. तर तुम्हे फक्त एक छोटसं रस्ते विकास महामंडळ, की त्यामध्ये जनतेशी संबंधच नव्हता. फक्त महामार्ग करायचा, समृद्धी महामार्ग करायचा, टनेल कराचे, कोस्टल रोड करायचे एवढंच होतं. जनतेशी संबंधीत असेललं कुठलं खातं, तुम्हाला वाटलं मुख्यमंत्री म्हणून चला माझा अधिकार आहे मी आणखी एक खातं त्यांना देतो, का नाही दिलं? याचा पण कुठं तरी विचार झाला पाहिजे. महाराष्ट्रपण विचार करेल आणि तुम्ही पण त्या संदर्भातील विचार त्या ठिकाणी केला पाहिजे.” असंही यावेळी अजित पवारांनी बोलून दाखवलं.