scorecardresearch

“जयंत पाटील पहाटेच्या शपथविधीबाबत जे बोलले ते खरं असेल तर शरद पवारांनी…” चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक

जयंत पाटील यांच्या वक्तव्याबाबत चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच आक्रमक

Jayant patil, Sharad pawar, Chandrashekhar Bawankule
काय म्हटलं आहे चंद्रशेखर बावनकुळे यांनी?

जयंत पाटील यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केलेलं वक्तव्य खरं असेल तर शरद पवारांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे. शरद पवार देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री होऊ द्यायचं नाही म्हणून जर तो खेळ केला असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्य जनमताचा अपमान केला आहे. जर जयंत पाटील खोटं बोलत असतील तर ते शरद पवारांचा अपमान का करत आहेत? यामध्ये मला दोन भाग दिसत आहेत की शरद पवार या कपटात सहभागी असतील. नाहीतर जयंत पाटील खोटं बोलत असतील तर त्यांचा काहीतरी राग असेल असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं आहे?

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगत आहेत की जे काही पहाटेच्या शपथविधीच्या वेळी घडलं तो शरद पवारांनी केलेला शकुनीमामांचा खेळ केला. तसं नसेल तर त्यांनी जयंत पाटील नेत्याची बदनामी का करत आहेत? देवेंद्र फडणवीस यांना शरद पवारांनी का मुख्यमंत्री होऊ दिलं नाही? शरद पवारांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आक्षेप का होता? या सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्या पाहिजेत अशी मागणी आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. दोन दिवसांपूर्वी जयंत पाटील यांनी पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांचीच खेळी होती असं वक्तव्य केलं होतं. त्यावरून आज चंद्रशेखर बावनकुळे आक्रमक झालेले पाहण्यास मिळाले.

देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत शरद पवार असं का वागले?

देवेंद्र फडणवीस का चालत नव्हते? देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ नये म्हणून एवढं मोठं महाभारत शरद पवारांना घडवावं लागलं? देवेंद्र फडणवीसांना जनतेने निवडून दिलं होतं. त्यांना मुख्यमंत्री होऊ दिलं नाही हे कारस्थान शरद पवारांनी केलं असेल तर हे वाईट आहे. असं राजकारण त्यांनी यापुढे करू नये अशी माझी त्यांना विनंती आहे असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील यांच्या म्हणण्याप्रमाणे शरद पवारांनी अजित पवारांना बळीचा बकरा केला? आपल्या घरातच शरद पवारांनी षडयंत्र रचलं आहे असं जयंत पाटील यांना म्हणायचं आहे का?ज्या पद्धतीने हे सगळं घडवून आणलं आणि जयंत पाटील एवढ्या उशिरा का बोलले? एकतर ते शरद पवारांना बदनाम करत आहेत आणि समजा शरद पवारांनी हे कारस्थान केलं असेल तर शरद पवारांचा खरा चेहरा जयंत पाटील जनतेच्या समोर आणत आहेत.

आत्तापर्यंत हे जे काही षडयंत्र महाराष्ट्रात झालं त्यात एकटे उद्धव ठाकरे हे आमच्यासमोर शकुनीमामाच्या भूमिकेत होते. महाभारताच्या युद्धातले दुर्योधन उद्धव ठाकरेच आहेत असं वाटत होतं. पण त्यामागे शकुनीमामा होते असं जयंत पाटील म्हणाले त्यांचा खुलासा शरद पवारांनी का केला नाही? शरद पवारांनी तुकडे तुकडे गँगचं सरकार का स्थापन केलं? उद्धव ठाकरे हे एकटेच यासाठी जबाबदार नाहीत तर शरद पवारही जबाबदार आहेत असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-01-2023 at 15:33 IST