शिवसेना नेते एकनाथ शिंदे तसेच जवळपास ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडले आहे. एकीकडे सरकार संकटात आलेले असताना राज्य मंत्रिमंडळाने मोठे निर्णय घेतले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराच्या संभाजीनगर नामकरणास आणि उस्मानाबाद शहराच्या धाराशीव नामकरणाचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मात्र औरंगाबाद शहराच्या नामकरणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध केला आहे. अन्य मार्गांचा वापर करु, असे खासदार जलील म्हणाले आहेत. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी नागरिकांसोबत गद्दारी केली आहे, असा आरोपही जलील यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> महाराष्ट्रात पुन्हा शिवसैनिक मुख्यमंत्री होणार, संजय राऊतांनी व्यक्त केली आशा

“उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी औरंगाबाद शहरात आले होते. उद्धव ठाकरे यांनी कोणती जादूची काडी फिरवली आणि विकास झाला? त्यानंतर औरंगाबाद शहराच्या नामकरणाचा निर्णय घेण्यात आला. तुम्ही म्हणाले होते, की मी या शहराला पाणीपुरवठा करेन, या शहराचा विकास करेन. मात्र याचं काय झालं, याचं उत्तर त्यांना द्यावं लागलं. करोनाची लागण झाली असेल तर ऑनलाईन येऊन उत्तर द्यावं. खालच्या दर्जाचं राजकारण करुन शहरात दंगा घडवून आणला जाऊ शकत नाही,” असे जलील म्हणाले.

हेही वाचा >>> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीमाना देणार का? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले…

तसेच, “मी औरंगाबाद तसेच उस्मानाबादच्या जनतेला शांतता राखण्याचे आवाहन करतो. सर्व रस्ते बंद झाले आहेत, असे नाही. आम्ही दुसऱ्या मार्गांचा अवलंब करू. काँग्रसे आणि राष्ट्रवादीने नेहमी खुर्ची वाचण्याचा खेळ केला. मला माहिती मिळाली आहे की काँग्रेसचे दोन मंत्री मंत्रिमंडळाची बैठक सोडून आले. त्यांनी राजीमाना द्यावा. नाटक करुन जनतेला मुर्ख बनवण्याचा प्रयत्न करु नये. कितीही नावे बदलली तरी औरंगाबादच्या जनतेसाठी औरंगाबाद शहर हे औरंगाबादच असेल,” असेदेखील जलील म्हणाले.

हेही वाचा >>> “माझ्याच लोकांनी दगा दिला”; मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्या भावना

तसेच समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनीदेखील औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाच्या निर्णयानंतर आपला निषेध नोंदवला. “औरंगाबाद तसेच उस्मानाबाद शहराच्या नामकरणाच्या निर्णयाचा निषेध करतो. मुस्लीम आरक्षणाकडे या सरकारने दुर्लक्ष केलं. जे भाजपा पक्ष म्हणतो तेच महाविकास आघाडी सरकार म्हणत आहे,” असे अबू आझमी म्हणाले आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Imtiaz jaleel criticizes renaming of aurangabad city as sambhaji nagar prd
First published on: 29-06-2022 at 21:42 IST