सोलापूर : सोलापूर एकेकाळी दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जायचा. परंतु उजनी धरणामुळे उपलब्ध झालेल्या पाण्यामुळे याच जिल्ह्यात देशात सर्वाधिक ४० साखर कारखाने ऊस गाळप करून प्रचंड प्रमाणावर साखर उत्पादन करतात. परंतु वाढत्या ऊस उत्पादनामुळे शेतकऱ्यांना भविष्यात आत्महत्या करण्याची वेळ येईल, अशी भीती केंद्रीय रस्ते विकासमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. सोलापुरात राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण प्रकल्पांचे लोकार्पण गडकरी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी बोलताना गडकरी यांनी इथेनॅल निर्मितीचा आग्रह धरताना वाढत्या ऊस उत्पादनाचा धोकाही सांगितला. ते म्हणाले,की वाढत्या उत्पादनामुळे साखर अतिरिक्त झाली आहे. दुसरीकडे ऊस उत्पादन आणि साखर उत्पादन यापुढेही असेच होत राहिले तर एक दिवस शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल, हा माझा शब्द आठवणीत ठेवा.