“ सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीवेळी प्रमुख नेत्यांकडून राजकारण झाल्याने, शेवटच्या क्षणी पक्षाकडून मला अर्ज मागे घेण्यास सांगितले गेले. पक्षावर असलेल्या विश्वासाने मी क्षणाचाही विचार न करता अर्ज मागे घेतला. पण, माझ्यावर राजकारण करून जरी कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी त्यांना सांगू इच्छितो कार्यकर्त्यांच्या ताकतीवर मी पुन्हा जिल्हा बँकेवर स्वाभिमानाने येणार आहे.” असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आज व्यक्त केले. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांना माघार घ्यावी लागल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यांना पुन्हा प्रवाहात आणण्यासाठी रहिमतपूर येथे त्यांनी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी नगराध्यक्ष आनंदा कोरे, वासुदेव माने, अविनाश माने, बेदील माने, नंदकुमार माने, चांदगणी आतार, विकास तूपे आदी उपस्थित होते. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच सुनील माने यांच्यावर झालेल्या अन्यायाची निंदा केली. त्याचबरोबर सुनील माने घेतील त्या निर्णयाबरोबरच राहण्याची ग्वाही देखील यावेळी कार्यकर्त्यांनी दिली. विशेष म्हणजे कार्यकर्ता मेळाव्याच्या बॅनरवरून राष्ट्रवादीचे सर्वच नेते गायब झाल्याने जिल्ह्यात वेगळीच चर्चा सुरु झाली आहे. “ तुम्हाला हिशोब करायचा असेल तर आमची पण तयारी आहे, कधीपण हिशोब करू एवढं लक्षात ठेवा ” सुनील माने म्हणाले, “राजकारणामध्ये नवीन संधी निर्माण करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे. माझी जनता हीच माझी संधी आहे. जिल्हाध्यक्ष म्हणून काम करत असताना सध्याच्या विरोधी पक्षाकडून आमदारकीसाठी पक्षाचे तिकीट देण्याचे ऑफर आली होती. परंतु, अनेक नेते कार्यकर्ते सत्तेच्या लालसेपोटी पक्ष बदलत असताना मी जिल्हाध्यक्ष म्हणून पक्षाशी एकनिष्ठ राहून पक्षांमध्ये स्थिरता आणण्याबरोबरच पक्ष वाढवण्याचे काम प्रामाणिकपणे, निष्ठेने केले. १९९९ पासून आजपर्यंत पक्षाचे नाव खाली जाईल अशा प्रकारचे वर्तन मी केले नाही. पक्षाकडून मिळालेल्या सर्व जबाबदाऱ्या मी ताकतीने पूर्ण केल्या. मिळालेल्या संधीचा वापर सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी केला. सर्वसामान्यांचे काम करताना एक रुपया घेतला नाही. जिल्हा बँकेमध्ये काम करताना सहा वर्षात बँकेचे उत्पन्न दुप्पट केले.” माझ्या पराभवासाठी शिवेंद्रसिंहराजेच जबाबदार, हे त्यांचंच षडयंत्र – शशिकांत शिंदे तसेच, तीन पक्षाचे सरकार असताना एका मताने काम करणे गरजेचे आहे. माझ्यावर राजकारण करून जरी कोणी मला दाबण्याचा प्रयत्न करत असेल, तर मी त्यांना सांगू इच्छितो कार्यकर्त्यांच्या ताकतीवर मी जिल्हा बँकेवर पुन्हा येणार. पण स्वाभिमानाने येणार असेही त्यांनी यावेळी सांगितले. त्याचबरोबर रहिमतपूर पालिका निवडणूक व सोसायटीमध्ये सर्व जागा जिंकण्याचे ध्येय ठेवल्याचे त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.