हिंगोली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळय़ानिमित्त आयोजित कार्यक्रमात भाजपामधील गटबाजी चव्हाटय़ावर आली. निष्ठावंत कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. सभागृहातील अर्ध्याअधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्या. कार्यक्रम संपल्यानंतर आपापली वाहने काढण्याच्या मुद्दय़ावरून दोन आजी-माजी आमदारात झालेली बाचाबाची जिल्हाभर चर्चेचा विषय बनला आहे.

आखाडा बाळापूर येथील इच्छापूर्ती मंगल कार्यालयात शुक्रवारी ‘शिवराज्याभिषेक मंगल कलश दर्शन यात्रा’ सोहळय़ाचे आयोजन करण्यात आले होते. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवार श्रीकांत चंद्रवंशी यांनी पुढाकार घेऊन हा सोहळा आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मध्यप्रदेश सरकारमधील उद्योगमंत्री राजवर्धन सिंह, विधान परिषद सदस्य राम पाटील रातोळीकर, आमदार तान्हाजी मुटकुळे, भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार गजानन घुगे, रामदास पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आखाडा बाळापूर गावात मोटारसायकल फेरी काढण्यात आली. या रॅलीलाही फारसा प्रतिसाद नव्हता. सभागृहामध्ये तर अर्ध्या अधिक खुर्च्या रिकाम्या होत्या. बाळापूर येथील पेट्रोल पंपासमोर भाजपच्या निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या सत्काराचे आयोजन केले.

Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
Kolhapur Lok Sabha, Hasan Mushrif
कोल्हापूरच्या आखाड्यात हेलिकॉप्टरवरून जुंपली
Shahu Maharaj
शाहू महाराज यांच्या विरोधात आक्षेपार्ह संदेश; सतेज पाटील यांची पोलिसांकडे तक्रार
Leaders of Mahayuti gathered in Kolhapur Determination of sanjay Mandaliks victory
कोल्हापुरात महायुतीचे नेते एकवटले; मंडलिक यांच्या विजयाचा निर्धार

स्थानिक नियोजनावरून निष्ठावंत कार्यकर्ते दुरावले होते. त्यात प्रदेशाध्यक्षांनी सत्कार न स्वीकारल्याने कार्यकर्ते पुन्हा दुखावले गेले. या कार्यक्रमाकडे पक्षाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांनीच पाठ फिरवली. कार्यक्रमाच्यानिमित्ताने भाजपमधील गटबाजीही पुन्हा चव्हाटय़ावर आली.लोकसभा निवडणुकीपूर्वी काही महिन्यांपासून हिंगोली लोकसभेत भाजपचे काम सुरू झाले. भाजपाच्या अनेक दिग्गज नेत्यांनी लोकसभा मतदारसंघात दौरे केले आणि लोकसभा लढण्यासाठी इच्छुकांना कामालाही लावले आहे.

गटबाजी पक्षाला न परवडणारी

भारतीय जनता पक्ष ग्रामीण पातळीवर पक्षबांधणीचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहे. त्यात निवडणूक लढू इच्छिणाऱ्या नेत्यांनी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी समन्वय साधायला हवा. पण तो समन्वय साधला जात नाही. त्यामुळे पक्षात मतभेद व गटबाजी असल्याचे चित्र आहे. आजचा कार्यक्रम हा पक्षाचा कार्यक्रम नव्हता, तरीही प्रदेशाध्यक्ष उपस्थित असताना पक्षाचे पदाधिकारी दूर राहिले. ही बाब दुर्दैवी आहे. पक्षाला गटबाजी परवडणारी नाही. एकमेकांत समन्वय साधायला हवा, असे मत कळमनुरीचे भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. प्रकाश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले.
कार्यक्रम संपल्यानंतर आपली वाहने आधी काढण्याच्या गडबडीत भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार गजानन घुगे व शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यात चांगलीच बाचाबाची झाली. आमदार बांगर यांनी मला मारण्याची धमकी दिली. मी सुद्धा त्यांना कुठे भेटू, एकटा येतो असे उत्तर दिले व ते कधी मारणार? यासाठी बराच वेळ त्यांच्या प्रतीक्षेत होतो. मात्र ते आले नाही, असे गजानन घुगे यांनी‘लोकसत्ता’ शी बोलताना सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नियोजित कार्यक्रमात अध्र्यापेक्षा जास्त खुर्च्या रिकाम्या होत्या.